Navi mumbai : नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. हाच पावसाचा जोर आजही कायम असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक छिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने शाळा, महाविद्यालये तसेच अनेक कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. रविवार पासून या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. नवी मुंबईसह इतर शहरात पावसाचा जोर आजही कायम आहे. नवी मुंबई परिसरात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. पुढील काही तासांत पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आजही पावसाचा जोर कायम असून सखल भागात पाणी साचले आहे. आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या बेलापूर, नेरूळ शहरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच वाशी, कोपरखैरणे, ऐरोली भागातही पाऊस कोसळत आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत (१८ ऑगस्ट सकाळी ८.३० ते १९ ऑगस्ट सकाळी ८.३० या कालावधीत) सरासरी १८५.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, उदयपूर, रतलाम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, जगदलपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, कोकण, उत्तर मराठवाडा, ते दोन्ही कमी दाबाच्या केंद्रांदरम्यान १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
मोरबे धरणाची स्थिती
नवी मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मोरबे धरण परिसरात काल १६३.६० मिमी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत धरण क्षेत्रातील एकूण २६८६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, धरणाची पातळी सध्या ८६.३१ मीटर असून ती ९१.५३ टक्के इतकी भरली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भरतीची माहिती
आज सकाळी ९.१६ वाजता समुद्रात ३.७५ मीटर उंचीची भरती येणार होती. तर रात्री ८. ५३ वाजता ३.१४ मीटर उंचीची भरती होणार असल्याता अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तर, शहरात पावसामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये ६ ठिकाणी झाड उन्मळून पडली. तर तीन ठिकाणी पावसाचे पाणी साचले.
विभागनिहाय पाऊस
बेलापूर – १८८.२० मिमी
नेरुळ – १७८.४० मिमी
वाशी – १७९.१० मिमी
कोपरखैराणे – १९१.४० मिमी
ऐरोली – १७६.८० मिमी
दिघा – १९६.२० मिमी