यंदा दिवाळी सणानिमित्त राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून सवलतीच्या दरात अतिरिक्त महत्त्वाचे दिवाळी शिधाजिन्नस (दिवाळी पॅकेज) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई शहरात शुक्रवार पासून वितरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्यात बेलापूर येथून सुरुवात झाली. बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते काही शिधाधारकांना आनंदाचा शिधा नावाने पॅकींग केलेला शिधा पॅकेज देण्यात आले. वाशी शिधावाटप कार्यालय अंतर्गत नवी मुंबईतील ४८हजार २७६ लोकांना याचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: शालेय विदयार्थ्यांनी केली आदिवासी मुलांची दिवाळी गोड

दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या चार महत्त्वाचे जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. रेशनकार्ड धारकांना शंभर रुपयात रवा, साखर,‎ चणाडाळ, तेल या चार वस्तुंचा समावेश आहे. याबाबत दि४ ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढण्यात आला. या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड जाणार अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर पासून दिवाळी शिधा वितरण करण्यास सुरुवात केली. परंतु हा शिधा एक आठवडा आधीच मिळणे अपेक्षित होते असे मत नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: ३० वर्षांपासून रखडलेला नाल्यावरील पुल अखेर मार्गी लागणार

दिवाळी फराळ बनवण्यासाठी एक आठवडा आधीच तयारीला सुरुवात होत असते. आता दिवाळीच्या तोंडावर दोन दिवस आधी शिधा देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दिवाळी शिधा वाटपाला विलंब झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर आनंदाचा शिधा वाटपाला बेलापूर पासून सुरुवात करण्यात आली असली तर अद्याप काही शिधा वाटप दुकानात याचे वितरण झाले नसल्याने शिधा धारक या दिवाळी शिधाजिन्नसच्या प्रतीक्षेत आहेत.