नागरिकांची अडचण; दुर्गंधीचाही त्रास
स्वच्छता अभियान हे फक्त पुरस्कारापुरतेच होते की काय? असा प्रश्न आता पडू लागला आहे. शहरात कचऱ्याचे दर्शन काही ठिकाणी होत असून देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने शौचालयांचीही दुरवस्था होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर नागरिकांसाठी बांधलेल्या शौचालयातच पाण्याची गंभीर समस्या आहे. यामुळे येथे सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
पालिकेने स्वच्छता अभियानाअंतर्गत शहरात मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती केली आहे. परंतु देखभाल नीट होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाच्या काळात सकाळपासूनच कर्मचारी कामाला लागत होते. परंतु आता हे चित्र नाही.
शहराच्या कारभारावर ज्या मुख्यालयातून नजर ठेवली जाते, त्या मुख्यालयाबाहेरच्या शौचालयात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची गैरसोय सुरू आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे सार्वजनिक शौचालय आहे. यात पाण्याचा पत्ता नाही अशी अवस्था आहे. या परिसरात दररोज सकाळी धावण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात येत असतात. तसेच एक पर्यटनस्थळ म्हणून भेटी देणारेही दिवसभरात खूप पर्यटक असतात. सायंकाळी कुटुंबीयांसह मुख्यालयाबाहेर फिरण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. या नागरिकांची गेले काही दिवस येथे गैरसोय होत आहे. मुख्यालयाबाहेर एकमेव शौचालय असून पाणीच नसल्याने दुर्गंधी येते. पालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षकही याच शौचालयाचा वापर करतात.
सकाळी धावण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांनी ही समस्या आमच्याकडे मांडली. ‘आम्ही रोज येथे सकाळी धावण्यासाठी येतो. परंतु शौचालयात गेल्यानंतर तेथे पाणीच नसते. ऐनवेळी मोठी गैरसोय होते. या ठिकाणी शौचालयात सातत्याने पाण्याची सुविधा गरजेची असल्याचे सीवूड येथे राहणारे कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.
यापूर्वी स्वच्छ अभियानात उभारलेल्या तुर्भे झोपडपट्टी परिसरातील गणपतीपाडा, चुनाभट्टी, बोनसरी गावातील शौचालयांची दुरवस्था ‘लोकसत्ता’ने समोर आणली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यांची दुरुस्ती केली.
पाण्याची व्यवस्था आहे. परंतु येथील ‘फ्लश’ खराब झाले आहेत. त्यामुळे सातत्याने पाणी वाहत असते. सकाळी पाण्याची टाकी भरल्यानंतर काही वेळातच टाकीतले पाणी संपते, असे देखभालीचे कंत्राटदाराकडील सुपरवायजर मनोज भगत यांनी सांगितले.
महापालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या शौचालयामध्ये पाणी नसेल, तर याबाबत काय अडचण आहे याची पाहणी करण्यात येईल व तत्काळ त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात येईल. स्वच्छता व देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला विचारणा करण्यात येईल. – संजीव शेगडे, स्वच्छता निरीक्षक