नवी मुंबई : सिडकोच्या जुन्या इमारतींच्या जागी नव्याने उभे राहाणारे पुनर्विकास प्रकल्प आणि नव्या विकास आराखड्यामुळे शहरातील बहुसंख्य उपनगरांचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे दिसत असतानाच नवी मुंबई महापालिकेने शहराचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील प्रत्येक उपनगरात असलेली उद्याने, धारण तलाव, फ्लेमिंगो तसेच दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला अधिवास, पारसिक डोंगरांच्या रांगा या सगळ्याचा अभ्यास करून पर्यटनासाठी नव्याने विकास संकल्पना आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सर्वकक्ष अभ्यास तसेच अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मुंबई गोवा महामार्ग दौऱ्यापूर्वी खड्डे भरण्यासाठी प्रशासनाची धडपड

पालिकेने नुकताच शहराचा अंतिम विकास आराखडा जाहीर केला. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाणथळीच्या जागा तसेच काही हरित पट्ट्यातील मोठ्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय या विकास आराखड्यात घेण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी नाराज आहेत. शहरातील मोक्याचे भूखंड निवासी तसेच वाणिज्य वापरासाठी खुले करण्यात आल्याच्या तक्रारीही पुढे येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे पाम बिच मार्गावर पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या केल्या जात असल्याने फ्लेमिंगो तसेच दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास धोक्यात असल्याच्या तक्रारी आहेत.

आराखडा तयार करण्यामागील उद्देश काय ?

महापालिकेच्या दाव्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात केंद्रस्थानी असलेल्या नवी मुंबईत पर्यटन विकासाचा भरपूर वाव आहे. नवी मुंबई हे फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. तसेच पाणथळ जमिनींवर येणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने नवी मुंबईच्या दिशेने येत असतात. हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी नवी मुंबई हे आवडीचे ठिकाण ठरू लागले आहे. या शहराच्या पूर्वेकडील बाजूस पारसिक डोंगर तसेच पश्चिमेस ऐरोली ते सीबीडीपर्यंत विस्तीर्ण असा सागरी किनारा आहे. या शहराची ही भौगोलिक रचना लक्षात घेता पर्यटनदृष्ट्या विकासाची मोठी क्षमता येथे असल्याचे नियोजनकर्त्यांचे मत आहे.

हेही वाचा – स्मार्टसिटी खारघरमधील ओवेकॅम्पात दोन दिवसाआड पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनाच्या केंद्रस्थानी काय?

नवी मुंबईतील जवळपास प्रत्येक उपनगरात उत्तम बगीचे आणि उद्याने आहेत. या शहरातील आम्र उद्यानेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई, धारण तलावालगतचे निसर्गसौंदर्य नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. या ठिकाणी कोणत्या सोयी, सुविधा पुरविणे आवश्यक आहे तसेच पर्यटन केंद्र म्हणून या भागांचा कसा विकास अपेक्षित आहे, याचा अभ्यास नव्याने केला जाणार आहे. हा सविस्तर पर्यटन विकास आराखडा तयार करत असताना जीआयएस तंत्राद्वारे नकाशे आणि जमीन वापरही निश्चित केला जाईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.