नवी मुंबई: व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र असे बिरुद मिरवणाऱ्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट, बेलापूर अर्थात सीबीडी बेलापूर सोमवारी २६ मे रोजी झालेल्या धुव्वाधार पावसात जलमय झाली. पावसाचे पाणी धारण तलावांद्वारे खाडीत सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २८ झडपा काँक्रीटने बुजवल्याने ही पूरस्थिती ओढवल्याचे निष्पन्न झाले. तरीही दोन दिवस उलटूनही पालिकेने या मानवी चुकीची कोणावरही जबाबदारी निश्चित न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारच्या पूरस्थितीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने ते संताप व्यक्त करत आहेत, दुसरीकडे या परिस्थितीला जबाबदार ठेकेदार, अभियंत्यांवरील कारवाईबाबत मात्र पालिका स्तरावर मौन आहे.

सोमवारी बेलापूर विभागात पडलेल्या १३३ मिमी पावसात बेलापूर अक्षरश: पाण्यात गेले. त्याच दिवशी नेरुळमध्ये बेलापूरपेक्षा अधिक १५५ मिमी. पाऊस झाला, परंतू बेलापूर विभागात ओढवलेले जलसंकट हे नैसर्गिक नव्हते तर ते मानवनिर्मित चुकांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. बेलापूर विभागातून वाहून जाणारे पावसाचे पाणी धारण तलावात येऊन ते खाडीत जाते.

परंतु सेक्टर १२ येथे सुरू असलेल्या पंपहाऊसच्या कामाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे खाडीत पाणी जाण्यासाठी असलेल्या २८ झडपा सिमेंट कॉंक्रीटच्या कामात बंद केल्या गेल्या. त्याबरोबरच बेलापूरकडून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पंपहाऊसच्या सुरुवातीला घातलेल्या मातीच्या भरावामुळे खाडीत जाण्याचा मार्ग न मिळाल्याने हे पाणी बेलापूर भागात तसेच रायगड भवन परिसरात साचले. या मानवी आणि अभियांत्रिकी चुकीमुळे बेलापूर पाण्यात गेले.

सीबीडीतील पाणी उपसा करण्यासाठी असलेल्या पंपहाऊसच्या ठिकाणी काम करताना ठेकेदारावर कोणाचे नियंत्रण होते? या ठिकाणी शहरातील पावसाचे पाणी खाडीत वाहून जाण्यासाठीचा मार्गच बंद झाला हे कोणाच्याच लक्षात कसे आले नाही? पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर ही मानवी चूक लक्षात येऊनही कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात सोमवारी कमी कालावधीत अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे निर्माण झालेली समस्या सोडवणे हे पहिले प्राधान्य असल्याने पाणी निचरा होण्यासाठी तातडीने काम केले. पण बेलापूर विभागात जबाबदार असतील त्याबाबत संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका