धातू मूलद्रव्यांचा अभ्यास आणि माहिती ही गेल्या काही वर्षांतच आपल्याला ज्ञात झाली असली तरी, त्यांचा वापर मात्र हजारो वर्षांपासून केला जातोय. सुमारे इसवीसनपूर्व ८००च्या कालावधीदरम्यान, आयस, म्हणजे काही धातू-मूलद्रव्यांचा उल्लेख, काही ग्रंथांमध्ये आढळतो. ऋग्वेदामध्ये असलेल्या उल्लेखांनुसार ‘आयस’ म्हणजे लोखंड! पण त्याआधीच्या वैदिक काळात लोहितायस म्हणजे लाल धातू म्हणजेच तांबं,तर कृष्णातायस म्हणजे काळा धातू म्हणजे लोखंड असा या मूलद्रव्यांचा उल्लेख आहे. तर कौटिल्य यांच्या काळात सर्व धातूंना लोह म्हटलं गेलंय. यजुर्वेदामध्ये आयस म्हणजे सोनं, हिरण्य म्हणजे चांदी, लोह म्हणजे तांबं (तांबे), श्याम म्हणजे लोखंड, त्रापू म्हणजे टीन अशी नामकरणे वाचायला मिळतात. यावरून आणखीही एक स्पष्ट होते की, त्या काळी खनिजापासून शुद्ध मूलद्रव्यं मिळवण्याची प्रक्रियाही तेव्हाच्या मंडळीना अवगत असावी; जी आजही खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदाच्या काळामध्ये, मूलद्रव्यांच्या आणि त्यापासून तयार होणाऱ्या रसायनांच्या विज्ञानात, एका थोर विचारवंताने उत्तुंग झेप घेतली. त्याच नावं होतं कौटिल्य! खाणकामावर असलेल्या अधिकाऱ्यांना किंवा धातूच्या वस्तू तयार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना कौटिल्याने अनेक महत्त्वाच्या ‘रेसिपी’ज् सांगितल्या होत्या. तांब्याची नाणी तयार करताना त्यात चार भाग चांदी, ११ भाग तांबं आणि एक भाग लोखंड अथवा अन्य कुठला तरी धातू असं नाणं तयार करण्याच्या प्रक्रियेचं सूत्र त्यांनी घालून दिलं होतं. धातूंचा कडकपणा जाऊन त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी ते मऊ व्हावेत म्हणून त्यांची काही विशिष्ट वनस्पतींच्या राखेबरोबर, शेळी किंवा गायीच्या दुधाबरोबर, गूळ किंवा मध यांच्या मिश्रणाबरोबर कशी प्रक्रिया करावी याची सविस्तर माहिती कौटिल्याने लिहून ठेवली आहे. बऱ्याचशा क्षारांचेही उल्लेख त्यांच्या लिखाणात आढळतात. त्याशिवाय मेडक, आसव, प्रसन्न, आरिष्ट अशी अनेक औषधी पेयं, तसेच अनेक बियांपासून तेलं काढण्याच्या प्रक्रियाही त्याने तयार केल्या. याचाच अर्थ म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याचे गुणधर्म वेगवेगळे असल्याचं कौटिल्य यांच्या लक्षात आलं होतं. त्यांच्या गुणधर्मानुसार रासायनिक प्रक्रिया करून आपल्याला हवे असलेले गुणधर्म असणारं रसायन तयार करण्याचं कौशल्य, कौटिल्य यांना अवगत झालं होतं. - डॉ. मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org परकीयांचा भारत प्रवेश साधारणत: इ.स.पूर्व पाचव्या शतकात, उत्तर भारतातल्या मगध साम्राज्याचा कापड, मौल्यवान वस्तूंचा व्यापार बॉबिलॉन, रोम आणि इतर युरोपियन देशांशी सुरू झाला. तिकडचे व्यापारी आणि त्यांचे संबंधित लोकांचे मगध आणि इतरत्र येणे-जाणे सुरू झाले. भारतीय तत्कालीन जनजीवन आणि येथील संपन्नता याची माहिती मध्यपूर्वेत आणि दूरवरच्या प्रदेशात पोहोचली. त्या लोकांना भारतीय प्रदेशाबाबत एक प्रकारचे गूढ आकर्षण वाटायला लागलं! त्याचा परिणाम भारतीय प्रदेशांवर आक्रमणे होण्यात झाला. मगध आणि मौर्यपूर्व काळात भारताची आर्थिक भरभराट होत असताना वायव्य प्रांतावर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. इराणी आणि ग्रीक आक्रमकांनी तत्कालीन भारताच्या सिंध प्रांतापर्यंत मजल मारली. सुरुवातीची परकीय आक्रमणे अल्पजीवी होती. परंतु त्यामुळे परकीयांशी प्रस्थापित झालेल्या संबंधांचा भारतीय संस्कृतीवर खोल ठसा उमटला. इ.स.पूर्व ३२७ मध्ये ग्रीक राजा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. हे भारतीय प्रदेशावर एका परकीयाने केलेले पहिले आक्रमण. त्याचा अंमल भारतीय प्रदेशावर काही फार काळ टिकला नाही. पण त्याच्यानंतर त्याचा सेनाधिकारी सेल्युकस याचा संघर्ष आणि संबंध मौर्य राजा चंद्रगुप्त याच्याशी आला. सेल्युकसने त्याच्या मुलीचा विवाह चंद्रगुप्ताशी करून एका भारतीयाशी नातेसंबंध जोडला. पुढे इंडो-ग्रीक वंशाच्या राजांनी भारतीय प्रदेशात सत्ता कमावून मोठय़ा प्रदेशावर अंमल केला. हा अंमल करताना त्यांनी तत्कालीन भारतीय धर्म, भाषा, रीतिरिवाज स्वीकारले. त्यांच्या पुढच्या काळात मूळच्या, चीनमधील रानटी जमातींचे शक, कुषाण भारताच्या भूमीवर स्थायिक झाले. त्यांनीही येथील धर्म, जीवनशैली आणि परंपरा स्वीकारून स्वत्व हरवले आणि ते भारतीयत्वात पूर्णपणे समरस झाले. पुढच्या काळात आलेले ख्रिस्ती मिशनरी भारताच्या विविध प्रदेशांत विखुरले गेले. अनेक मिशनऱ्यांना भारतीय भाषांनी अशी काही भुरळ घातली की त्यातल्या अनेकांनी भारतीय भाषांचा सखोल अभ्यास केला, त्या भाषांमध्ये त्यांनी नपुण्य मिळवून त्यात ग्रंथनिर्मितीही केली. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com