भूकंप ही पृथ्वीतलावर सातत्याने घडणारी घटना आहे. भूकंपामुळे मोठय़ा प्रमाणावर आíथक आणि जीवितहानी होते. त्यामुळे भूकंपाचा वेध घेणं आणि त्याच्या तीव्रतेसंबंधी अंदाज व्यक्त करण्याचे प्रयत्न मानव शेकडो वर्षांपासून करीत आला आहे. इसवी सन १३२ साली चिनी पंचांग आणि इतिहास खात्याचा प्रमुख चँग हेंग याने भूकंपाचा वेध घेण्यासाठी एक अजब साधन तयार केलं. एका रांजणासारख्या उभट दिसणाऱ्या धातूच्या भांडय़ाच्या बाहेरच्या बाजूला ड्रॅगन या प्राण्याच्या आठ मूर्ती बसवल्या होत्या. या प्रत्येक ड्रॅगनच्या तोंडामध्ये धातूची एकेक जड गोळी ठेवली होती. प्रत्येक ड्रॅगनच्या तोंडाच्या बरोबर खाली ‘आ’ वासलेले धातूचे बेडूक ठेवले होते. भांडय़ांच्या आतमध्ये मध्यभागी एक उभा दांडा टांगलेला होता आणि या दांडय़ाला ड्रॅगनच्या तोंडाशी विशिष्ट पद्धतीने जोडलं होतं. भूकंप झाला की त्याच्या कंपनामुळे दांडा हलायचा आणि त्यामुळे एखाद्या ड्रॅगनच्या तोंडातून धातूची गोळी निसटून बेडकाच्या तोंडात पडायची. यावरून चँग हेंग भूकंपाचं आणि तो कोणत्या दिशेला झाला आहे, हे सांगायचा. अनेक वेळा त्याने सांगितलेली माहिती अचूक असायची. चँग हेंगने केलेलं ‘होउफेंग डिडोंग’ नावाचं हे साधन म्हणजे जगातलं पहिलं भूकंपदर्शक यंत्र म्हणता येईल. भुकंपामुळे बसणाऱ्या हादऱ्यांची नोंद ज्या यंत्राच्या मदतीने केली जाते, त्या यंत्राला ‘भूकंपमापी’ किंवा ‘सेस्मोमीटर’ म्हणतात. साध्या भूकंपमापीच्या तळाशी एक जाडजूड वजनदार ठोकळा असतो. ठोकळ्याच्या एका बाजूला एक वजनदार खांब उभा केलेला असतो. त्याला एक लंबक टांगलेला असतो. लंबकाच्या गोळ्याला पेन्सिल बांधलेली असते. पेन्सिलचं टोक तिच्या खाली असलेल्या आलेख कागदावर टेकवलेलं असतं. भूकंपाचा धक्का बसला की, भूकंपमापीचा खालचा ठोकळा आणि खांब यांना कंपनं मिळतात. या कंपनांमुळे लंबक आंदोलित होतो आणि ही मग लंबकाची कंपनं पेन्सिलमुळे आलेख कागदावर तरंगांच्या स्वरूपात उमटतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे अत्यंत आधुनिक असे सेस्मोमीटर आज शास्त्रज्ञांकडे उपलब्ध आहेत. - हेमंत लागवणकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org ‘सुमित्रानंदन’ पंत (१९६८) सुमित्रानंदन पंत हे हिंदी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी आहेत. त्यांनी भाषेवर संस्कार करण्याचे, भाषेचे सामथ्र्य प्रकट करण्याचे तसेच नवीन विचारांनी भाषा समृद्ध करण्याचेही कार्य केले. हिन्दी कवितेतील ‘छायावादी’ प्रवाहाचे ते मुख्य प्रवर्तक आहेत. भारतीय ज्ञानपीठाचा १९६८ चा साहित्य पुरस्कार ‘चिदम्बरा’ या काव्यसंग्रहासाठी ‘सुमित्रानंदन’ यांना देण्यात आला. सध्या उत्तराखंडात असलेल्या अल्मोडा जिल्ह्यतील कौसानी या गावी २० मे १९०० या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गुसाईदत्त. पण लहानपणीच आई सुमित्रा यांचे निधन झाल्याने, त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून काव्यलेखनासाठी ‘सुमित्रानंदन’ हे टोपणनाव घेतले आणि तीच आयुष्यभर त्यांची ओळख ठरली. खेडय़ातच प्राथमिक शिक्षण, पुढे वाराणसीत महाविद्यालयीन शिक्षण आणि काव्यलेखन हे सुरू असताना १९२० मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीने ते प्रभावित झाले. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट राहिले, पण १९२० मध्येच ‘उच्छ्वास’ आणि ‘ग्रंथ’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. मग चळवळीतील काही वर्षांनंतर, १९२७ मध्ये ‘वीणा’ हा काव्यसंग्रह आला. तोवर, स्वभाव एकांतप्रिय असल्याने सक्रिय राजकारण झेपणारे नाही, हेही पंत यांना उमगले असावे. भाषेत मात्र त्यांनी क्रांतिकार्यच केले! एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हिन्दी कविता मुख्यत ब्रज व अवधी बोलींत लिहिली गेली. पण आधुनिक जीवनानुभवाचे साहित्य लिहिण्यासाठी खडी बोली वापरावी, यासाठी ज्यांनी पहिले प्रयत्न केले, अशा छायावादी कवींत (पंतांसह ‘निराला’, जयशंकर प्रसाद इ.) पंतांचा वाटा सिंहाचा होता. निसर्गरूपांशी तादात्म्य पावतानाच आधुनिक काळातील विश्वमानवाच्या भावभावनांचे दर्शनही त्यांनी घडवले. त्यात भाषेचे - खडी बोलीचे- सौंदर्य, लालित्य कुठेही उणे नाही, हे दाखवून दिले. सूक्ष्म भावकल्पना व्यक्त करण्यासही खडी बोली समर्थ आहे, याची साक्ष त्यांच्या काव्याने दिली. हिन्दी काव्यातील आधुनिक युगाचे प्रवर्तक मानले जाणाऱ्या पंत यांच्या ४० हून अधिक पुस्तकांपैकी ३३ कवितासंग्रह आहेत. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com