पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांवर नजीकच्या सरकारी रूग्णालयांमध्ये उपचार सुरु असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आदिवासी विकास विभागाकडून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळा चालविल्या जात आहेत.

डहाणू प्रकल्प कार्यालय अंतर्गत ३७ आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल शाळा असून यामधील ८५८५ निवासी व १०५९२ अनिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण १९१७७ विद्यार्थ्यांना बोईसर जवळील कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून रोज दोन वेळचे भोजन आणि दोन वेळा अल्पोहार यांचा पुरवठा केला जातो. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून सोमवारी रात्रीसाठी दुधीची भाजी, मुग डाळ, चपाती आणि भात या अन्नपदार्थाचा समावेश असलेले जेवण पुरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतर रणकोळ, खंबाळे, नानिवली, तांदूळवाडी, नंडोरे आणि इतर अशा ११ आश्रमशाळांमधील जवळपास तीनशेपेक्षा अधिक निवासी विद्यार्थ्यांना मंगळवारी पहाटेपासून अचानक पोटदुखी, उलटी, मळमळ जुलाब सारखे त्रास होऊ लागल्याने त्यांना नजीकच्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा…Palghar Police : ९ वर्षांत २० लग्नं, महिलांकडील लाखोंचा ऐवज घेऊन फरार झालेला भामटा पालघर पोलिसांच्या जाळ्यात

दाखल सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जेवणातून विषबाधेचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्वच आश्रमशाळांवर आरोग्य पथके नेमून त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत उपचार देण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके हे स्वत: सर्व परिस्थितीची माहिती घेत असून प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी आश्रमशाळा आणि रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

डहाणू प्रकल्प अंतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविण्याऱ्या कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला अन्न व औषध विभागाचे अन्न निरीक्षक उमेश कावळे आणि बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अहीरराव यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय असलेल्या सोमवारी रात्रीच्या जेवणाचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा…जेएनपीए’च्या बंदरात कृषी मालाची साठवण यंत्रणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डहाणू प्रकल्प अंतर्गत काही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधेसारखा त्रास झाला असून त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. – डॉ. गोविंद बोडके