डहाणू : डहाणू तालुक्यातील धानीवरी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन बांबू लागवड कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी बांबूची रोपे लावून शेतकऱ्यांना बांबू उत्पादन, बांबू शेतीचे फायदे आणि त्यापासून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बांबू पासून विमानाचे इंधन तयार करता येणार असल्याची माहिती देण्यात आली असून यासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबवण्याची तयारी एका उद्योजकडून दर्शवण्यात आली. यामुळे बांबू उत्पादन घेतल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बांबू उत्पादन सुरू करण्यासाठी तयारी दर्शवण्यात आली.
जिल्ह्यात बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू उत्पादनाच्या फायद्यांचे विश्लेषण केले. शिवाय त्यांच्या सोबत उपस्थित उद्योजक दिनेश शर्मा यांनी बांबू पासून इंधन तयार करता येणार असून हे इंधन विमान आणि जहाजासाठी वापरता येणार असल्याची माहिती दिली. जिल्ह्यात बांबू उत्पादन जास्त प्रमाणात झाल्यास बांबू वर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी असून प्रकल्पासाठी रोज किमान १५०० टन बांबूची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली.
बांबू लागवड आणि संगोपनासाठी शासनाकडून हेक्टरी ७ लाख ४ हजार रुपये आणि रोप उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाच्या रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना मजुरी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत मध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. एकट्या धानीवरी गावात ३०० ते ४०० शेतकऱ्यांकडून बांबू लागवडीसाठी पुढाकार घेण्यात आला असून ही संख्या १००० वर घेऊन गेल्यास वर्षातून एकदा बांबू शेतीची पाहणी करण्यासाठी येणार असून भविष्यात गावातील नागरिकांना विविध योजना मिळवून देण्यासाठी गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा पाशा पटेल यांनी केली.
बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार असून बांबू पासून हस्तकलेच्या विविध वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, इंधन यासारखे विविध पदार्थ आणि वस्तू तयार करता येतात. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या पिकाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करणार असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले. तसेच बांबू उत्पादन वाढल्यास बांबू सहकारी संस्था स्थापन करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
धानीवरी गावातील नागरिकांनी बांबू उत्पादनासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय प्लास्टिक मुक्ती साठी प्लास्टिकला बांबूचा पर्याय देत येणार आहे. एकीकडे जंगल नष्ट होण्यामागे जंगलातील आदिवासींच्या नावावर ठपका ठेवणाऱ्यांसाठी धानीवरी गावातील नागरिकांनी चपराक दिली असून समाजासमोर नवीन आदर्श उभा केल्याचे बोलले जात आहे.