बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रसायनाची संशयास्पद वाहतूक करणारा टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. टँकर मधील रसायनाचे नमुने घेऊन त्याचे प्रयोगशाळेत पृथकरण केले असता रसायनाचा साठा हा पर्यावरणास घातक असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईसाठी पोलिसांना सादर करण्यात आला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यातून निघालेला संशयास्पद टँकर (एम.एच.०४, डी. एस.९६२८ ) खैरापाडा तपासणी नाका येथे सहा मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन बोईसर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केला होता. पोलिसांनी टँकर मधील रसायनासंबंधित कागदपत्रांची मागणी केली असता चालकाकडे आवश्यक कागदपत्रे आढळून आली नव्हती. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर क्षेत्र अधिकारी यांनी टँकर मधील रसायनाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. २६ मे रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेचा अहवाल तारापूर कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
रसायनाची वाहतूक करणारा टँकर हा अष्टविनायक एंटरप्राइजेस या कंपनीचा असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी-शर्तीनुसार टँकर मधून घातक रसायनाची वाहतूक करण्याआधी टँकर मालकाने मॅनीफेस्ट (फॉर्म १०) च्या ऑनलाइन प्रती सादर केल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे टँकर मधील रसायनाच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत पृथक्करण केले असता रसायनाचा सीओडी हा १२३२०० प्रति मिलीग्रॅम असल्याचे अहवालात नमूद करून ते घातक असल्याचे स्पष्ट केले आहे. टँकर मधून घातक रसायनाची बेकायदा वाहतूक करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीशर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अष्टविनायक इंटरप्राईजेस या कंपनी विरोधात कारवाई करण्यासाठीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे तर औद्योगिक परिसरातील ज्या कंपनीमधून घातक रसायन टँकरमध्ये भरण्यात आले त्या कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी बोईसर पोलिसांना कळविण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांमार्फत परिसरातील राजकीय आणि वजनदार मंडळींना हाताशी धरून उच्च सीओडी आणि टीडीएसयुक्त रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे परिसरातील निर्जन जागा, नैसर्गिक नाले ,ओहोळ, तलाव आणि खाडी परिसरात बेकायदा विल्हेवाट लावली जाते. यामुळे खाडी आणि समुद्रातील मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार घडत असून शेती व बागायती नापीक होण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषित होत असल्याचे तक्रारी नागरिक करत असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत आहे.