वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवजड वाहतूक होत असल्याचा नागरिकांचा आरोप
वाडा: शिरीष फाटा – कांबारे – वाशिंद मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे सावरोली येथील तानसा नदीवरील पुलाला तडे गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुलाची प्राथमिक पाहणी केली असुन संरचना लेखापरीक्षण (स्ट्रक्चर ऑडिट) करण्यात येणार असल्याची माहिती शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बलवंत कांबळे यांनी दिली.
तर या मार्गावरील अवजड वाहतुक बंद करावी, तसेच नादुरुस्त पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शहापूर मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वाडा – भिवंडी” महामार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मात्र याचाच फायदा घेत जवळपास ४० ते १०० टन वजन असलेली वाहने शिरीष फाटा – कांबारे- वाशिंद या पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसून येत असल्याने हा मार्ग देखील धोकादायक स्थितीत झाला असुन नागरिकांशी जीवघेणा ठरत असल्याची भीती व्यक्त केली आहे.
वाडा, पालघर, गुजरात येथून भिवंडी, कल्याण, शहापूर, ठाणे, नाशिकच्या दिशेकडे कडे जाणारी किंवा तेथून वाड्याच्या दिशेकडे येणारी ४० ते १०० टन वजनाची अवजड वाहने सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून अवजड वाहतुकीस प्रतिबंध असणाऱ्या तानसा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या (वनविभागाच्या) मार्गाचा अवलंब करत वाड्यावरून शिरीष फाटा येथे वळून कांबारे मार्गे पिवळी – वाशिंद किंवा वाड्याच्या दिशेकडे जाण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतील मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने रात्रीच्या वेळी इतर लहान वाहनांना अजिबात जुमानत नसल्याचे (दुचाकी, कार) नागरिकांनी सांगितले.
मुळातच हा रस्ता आधीच अरुंद असुन तो मागील वर्षी शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून सुस्थितीत केला आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने रस्ता आता पुन्हा खराब होऊ लागला आहे. व नुकताच याचा परिणाम अवजड वाहतुकीमुळे सावरोली येथील तानसा नदीवरील पुलाला तडे गेल्याने तो पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची उंची देखील अत्यंत कमी असुन या रस्त्यावरून होणारी वाहतूक जीवघेणी ठरली आहे.
वनविभागाच्या बेजबाबदार पणामुळे अवजड वाहनांना प्रवेशा दिल्याने मार्ग धोकादायक स्थितीत. शिरीष फाटा – कांबारे- वाशिंद या मार्गाचा बहुतांशी भाग तानसा वन्यजीव अभयारण्याच्या अत्यख्यारीत येत असून याच वनविभागाच्या अंतर्गत शहापूर तालुक्यातील सावरोली आणि वांद्रे (पिवळी) येथे वनविभागाची चौकी आहेत.
या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना ती वनविभागाकडून करण्याऐवजी चौकीमध्ये ड्युटी करिता नेमलेले वनकर्मचारी या रस्त्यावर प्रवेश देण्यासाठी अवजड वाहनांकडून प्रत्येकी २००,५०० ते १ हजार रुपये प्रवेश फी (एंट्री) घेवून सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे पैसे प्रत्येक वाहनानुसार असते. दररोज जवळपास २० ते २५ हजार रुपये रक्कम जमा होत असल्याचे एका नागरिकांनी सांगितले आहे.
याबाबत वन कर्मचारी यांना याबाबत विचारले असता स्थानिक वाहन चालकांना पास दिले असून ते पाहूनच प्रवेश दिला जात असल्याची माहिती दिली.
मात्र अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना त्यांच्याकडून पैसे घेवून प्रवेश दिला जात असल्याबाबत विचारले असता त्यांनी बोलायचं टाळलं.
त्यामुळे वनविभागाच्या चौक्यांमध्ये नेमलेले वन कर्मचारी हे सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीस प्रवेश देण्यासाठी पैसे गोळा करण्यात व्यस्त राहिल्याने हा रस्ता धोकादायक स्थितीत ठरला आहे. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कांबारे- वाशिंद मार्गावर अवजड वाहतुकीला परवानगी दिलेली नव्हती. मात्र अनेक वाहने इतर रस्ते खराब किंवा हा रस्ता सोपा पडत असल्याने या मार्गाचा अवलंब करत आहेत. अवजड वाहतूक बंद करण्यासाठी वनविभागाला पत्र देण्यात येणार आहे. बळवंत कांबळे- उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूर
अवजड वाहनांना “अघई – कांबारे- शिरीष फाटा” मार्गावरून होणारी वाहतूक प्रतिबंध /प्रवेश बंदी करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
नुकताच कांबारे – वाशिंद रस्त्यावरील सावरोली येथील तानसा नदीवरील पुलाला तडे गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाच्या हद्दीतील मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने आता अवजड वाहनांनी थेट आपला मार्ग आता बदलला आहे. अवजड वाहनांकडून आटगांव – अघई – कांबारा किंवा भिवंडी – पिवळी – अघई – कांबारा – शिरीष फाटा मार्गे वाडा वाहतूक (ये – जा) करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे हा रस्ता देखील धोकादायक बनला असुन अवजड वाहतूक होत राहिल्यास एकमेव सुस्थितीत राहिलेला रस्ता देखील निकृष्ट होईल आणि आम्हाला रस्त्या अभावी वंचित राहून मन:स्ताप सहन करावा लागेल असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. हा मार्ग देखील वनविभागाच्या हद्दीत येत आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीला तातडीने प्रवेश बंदी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा प्रशासनाने अवजड वाहतूकी बाबत ठोस कारवाई किंवा उपायोजना असे न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.