पालघर: १२ मार्च २०२५ रोजीचा शासन निर्णय तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्या १५ मे २०२५ रोजीच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात ‘१०० शाळा भेटी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी व श्रेणी १ व २ चे अधिकारी १६ व १७ जून रोजी जिल्ह्यातील निवडक १४१ शाळांना भेटी देणार आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यावर भर देणे हा आहे.

विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार १६ जून २०२५ पासून सुरु होत असून, पहिल्या दोन दिवसांत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील अधिकारी हे आपल्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एक शाळेला भेट देणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटींचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी २४ शाळांना तर अधिकारी ११७ शाळांना भेट देतील. याकरिता प्रत्येक मान्यवरासाठी एक संपर्क अधिकारी नेमण्यात आला आहे.

या भेटीदरम्यान शाळांमध्ये विशेष आयोजन केले जाणार असून, नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. “पहिले पाऊल” या संकल्पनेतर्गत पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पायाचा ठसा घेतला जाईल व त्याची प्रत पालकांना दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात येणार असून, शाळेचा पहिला दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रभातफेरी, पालक व शिक्षण अंगणवाडी सेविकांची उपस्थिती, तिथी भोजनाचे आयोजन आदी उपक्रम राबविले जातील.

शाळा सुरु होण्याआधी परिसराची स्वच्छता, ग्रामभागात दवंडी, व्हॉट्सॲप ग्रुप व नोटीस बोर्डाद्वारे माहिती प्रसारित केली जाणार आहे. या उपक्रमात मान्यवरांकडून शाळेतील शिक्षण गुणवत्ता, निपुण महाराष्ट्र अभियान, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, क्रीडा साहित्य, पोषण आहार योजना, विविध स्पर्धा परीक्षा अशा विविध घटकांचा आढावा घेतला जाणार आहे. आवश्यक तेथे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

या भेटीदरम्यान भेट दिलेल्या शाळा मान्यवर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी ‘दत्तक शाळा’ म्हणून देण्यात येणार आहेत. हे अधिकारी वर्षभर त्या शाळांना वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेणार असून आवश्यक त्या सुधारणा व मार्गदर्शन करतील. याशिवाय, शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी – प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी यांनाही प्रत्येकी दोन शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे १०० टक्के पट नोंदणी सुनिश्चित करणे. यासाठी शिक्षकांनी अंगणवाडी व बालवाड्यांना भेट देऊन पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करावी, पालकांशी संवाद साधून त्यांना जिल्हा परिषद/नगरपालिका शाळांमधील सुविधा, उपक्रम व शिष्यवृत्ती याबाबत माहिती द्यावी, तसेच सामाजिक माध्यमांवर प्रभावी प्रसिद्धी करावी. काही शाळांनी यासाठी नाविन्यपूर्ण जाहिरात व प्रचार सुरूही केला आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी सुसंगतपणे व्हावी यासाठी जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाने तयारीची पूर्ण आखणी केली आहे. आतापर्यंत सर्व तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन बैठकांचा आयोजन करण्यात आला आहे. तसेच १२ जून रोजी १७८ अधिकाऱ्यांसह कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये या संपूर्ण उपक्रमाचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी योजना/माध्यमिक शेषराव बडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते. ‘१०० शाळा भेटी’ हा उपक्रम फक्त औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.