पालघर: संघर्षमय व्यवसायातून मच्छीमार उभा राहण्यासाठी धडपड करत असताना परतीच्या पावसाने त्याच्यासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे केले आहे. मासे सुकवण्याच्या ऐन हंगामात जोरदार पावसामुळे सुक्या मासळीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: या काळात वळवणीला सुकत असलेल्या बोंबील मासळीचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवडय़ात आलेल्या पावसाने किनारपट्टी भागाला झोडपून काढले. किनारपट्टी भागात वाळत टाकलेली सुकी मासळी बाधित झाली. डहाणूमध्ये चिखले, आगर, डहाणू खाडी व गाव परिसर, उच्छेळी-दांडी, पालघर तालुक्यात सातपाटी, वडराई, एडवन, दातीवरे, कोरे अशा किनारपट्टी भागामध्ये मासळीला पावसाचा मोठा फटका बसला. काही प्रमाणात वाळलेली मासळी पावसामुळे भिजून खराब झाली. त्यात बोंबील, मांदेली, कोळंबी, सुकट, करंदी, लहान पापलेट, वाकटी-पाटय़ा, लहान शिंगाडा आदींचा समावेश आहे.मासे वाळविण्याच्या हंगामातच पावसाने नुकसान केल्याने मच्छीमार चिंतातुर आहेत. शासनाने या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
दर वाढण्याची भीती
सुक्या मासळीला पावसाचे पाणी लागल्याने ती पुन्हा वाळविल्यास त्याची चव येत नाही. तर काही प्रकारचे मासे कुजण्यास सुरुवात होते. मासे सुकण्याचे प्रमाण कमी राहिले तर सुक्या मासळीचा दर गगनाला भिडणार आहे. त्याचा थेट फटका मच्छीमार व सुकी मासळी विक्रेत्यांच्या साखळीला बसेल अशी भीती वर्तवली जात आहे.
मासेमारीच्या प्रमाणात घट
तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मासेमारीचे प्रमाण कमी असल्याने मच्छीमार चिंतेत आहेत. एका फेरीला तीनशे ते चारशे किलो पापलेट जाळय़ात मिळणाऱ्या एका बोटीला यंदा शंभर किलो पापलेट मिळणे मुश्कील झाले आहे. तर इतर माशांच्या मासेमारीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे फेरीला डिझेल इंधनाचा खर्चही निघत नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत.
संकटात सापडलेला मच्छीमार व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अनेक विघ्नांमुळे तो आणखीन संकटात सापडत चालला आहे. संकटाच्या जाळय़ात सापडलेल्या मच्छीमारांना बाहेर काढावे हीच सरकारकडून अपेक्षा आहे. पावसाने नुकसानी झालेल्या सुक्या मासळीची नुकसानभरपाई द्यावी अशीही मागणी आहे.
–जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार सहकारी संघ