डहाणूतील शेतकऱ्याकडून तक्रार; प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन

डहाणू : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सरकारी कर्मचारी लाभ घेत असल्याने डहाणूतील एका शेतकऱ्याने तक्रार आहे. यामुळे योजनेतील त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नसून तसा लाभ घेतला असल्यास आपण त्याबाबत खातरजमा करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन प्रांत अधिकारी अशिमा मित्तल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

सन २०१८ पासून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दर तीन महिन्याने २००० रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. असे असताना एका रेल्वे कर्मचाऱ्याने हा लाभ  घेतला असल्याबाबत वाढवण येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र आपण याबाबत तलाठींकडे पंतप्रधान योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, असे लेखी कळवल्याचे लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना

सांगितले. मात्र या तक्रारीमुळे सरकारी कर्मचारी बेकायदा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

सरकारी कर्मचाऱ्याला किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येत नाही. असे असताना वाढवण येथे काही लाभार्थी हा लाभ घेत असल्याचे आपण लेखी तक्रार केली आहे.

– नरेंद्र सुतारी, तक्रारदार

सरकारी कर्मचाऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येत नाही, मात्र असे प्रकार असल्यास आपण त्याकडे जातीने लक्ष घालू.

– असीमा मित्तल, प्रांत अधिकारी डहाणू

आपण सरकारी नोकर असल्याने किसान सन्मान योजनेचा आपणास लाभ देण्यात येऊ  नये, असे मा. तलाठी यांच्याकडे लेखी कळवले आहे.

– अविनाश पाटील, कर्मचारी