पालघर: वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जाताना हरित महाराष्ट्राची संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी दुर्गम पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर बांबू लागवड करून संपूर्ण विश्वाला संदेश देण्याचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाची माहिती देताना मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले,’आदिवासी पाड्यावरून जगाला संदेश 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यादिवशी राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड , मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल , श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित ( राज्यमंत्री दर्जा) उपस्थित राहणार आहेत’.
मागील दोन महिन्यापासून संपूर्ण पालघर जिल्हा बांबूमय झाला आहे. पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पाशा पटेल आणि श्रमजीवी संघटना आणि जिल्हा प्रशासनाने जनजागृती मिळावे आयोजित करून शेतकरी वर्गाला जागृत केले आहे.
जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांबू लागवडीसाठी अर्ज दाखल केले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या वनपट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये नागरी ग्रामीण आणि डोंगरी अशी विषम सामाजिक भौगोलिक परिस्थिती आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सार्वजनिक आणि सामूहिक लाभाच्या योजना राबवून खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा आमचा मानस आहे, असे उप जिल्हाधिकारी विजया जाधव म्हणाल्या.
पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये झंझावती बांबू मिशन मिळावे पार पडल्यानंतर दोन जून रोजी वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यानंतर 50 लाख बांबू वृक्ष लागवडी चा शुभारंभ आदिवासी पाडा असलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत धानिवरी अंतर्गत बांबू लागवडीचा शुभारंभ होणार आहे.बांबू लागवड झाल्यानंतर जाहीर कार्यक्रम कडुपाडा – नवापाडा या ठिकाणी पार पडणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संबंध प्रशासन एका आदिवासी पाड्यावर येऊन बांबू रोपांची लागवड करेल. या कृतीतून पालघर जिल्हा राज्याला देशाला आणि जगाला संदेश देणार आहे. ‘सेव्ह द अर्थ विथ बांबू’ या संदेशातून आपण जवळच्या मुंबई शहराला वाचवणार आहोत, असे मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेवटी सांगितले.
” वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला नुकताच मान्सूनपूर्व पावसाने फटका दिला. कोविडचा संसर्ग देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कार्बन उत्सर्जन थांबून ऑक्सीजन निर्मिती करून जग वाचवण्यासाठी आता बांबू लागवड शिवाय पर्याय नाही. पालघर मध्ये जिल्हा प्रशासन श्रमजीवी संघटनेने अथक प्रयत्न करून पर्यावरण दिनी 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यातून आम्ही अखंड विश्वाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहोत.” -पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग
कार्यकारी अध्यक्ष, मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दल
जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2025
ग्रामपंचायत : धानिवरी तालुका :डहाणू जिल्हा पालघर
कार्यक्रम स्थळ- कडुपाडा – नवापाडा