वाडा : वाडा व मोखाडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याबाबत कृषि व महसूल विभागाने पंचनामे पुर्ण करुन अंतिम अहवाल महसूल प्रशासनाकडून शासनस्तरावर सादर केला आहे.वाडा तालुक्यात घरपरझड आणि आंबा फळपिकांचे ३६ लाख ८० हजार तर मोखाडा तालुक्यात घरपरझड ०६ लाख ८ हजारांचे आणि फळपीकांचे १३ लाख ६४ हजार असे एकुण ५६ लाख ५२ हजारांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई निधीची मागणी करीता शासनाकडे अहवाल पाठविला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची प्रतिक्षा करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात ०४ एप्रिल रोजी वाडा, मोखाडा तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून अनेक ठिकाणी गारपीट झाली होती.या वादळी वाऱ्याने अनेकांचे घरांची परझड तसेच फळबागायतर आणि रब्बी पीक, भाजीपालांसह काढणीसाठी सज्ज कडधान्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी केली होती, त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामे पुर्ण करुन अहवाल शासनस्तरावर पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहेत.

वाडा तालुक्यात ३६ लाख ८० हजारांचे नुकसान-वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने वाडा, मांगरुळ, परळी, जामघर, नेहरोली, चिखले, खुपरी, आलमान, वरई खु, किरवली, कुयलू, वरसाळे, सापने खुर्द, आबिटघर, तिळगांव, कळंभे, दाढरे, निशेत, धापड, पिंपरोळी, सारशी, तुसे, मोज, करांजे, कांबारे, कळंभोली सोनाळे बुद्रुक, सोनाळे खुर्द, फणसगांव, बालिवली, शिरसाड या ३१ गावांतील एकूण २०५ घरांचे १० लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.तर ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ६५ गावांमधील ३०१ शेतकऱ्यांचे ७३.०५ हेक्टर आंबा फळबाग पिकांचे २६ लाख ३० हजारांचे कृषी विभागाच्या अहवालाच्या अनुषंगाने नुकसान झाले असल्याची माहिती वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

मोखाडा तालुक्यात १९ लाख ७२ हजारांचे नुकसान- मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने आंबा, काजू फळझाडांसोबत वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. यात चार साझांमधील दुधगाव, गोमघर, वाशिंद, खोडाळा, आडोशी, पाथर्डी, बोटोशी, कुर्लोद, खोच यांसह आदी गावांमधील १२१ नागरिकांची घरे बाधित (घरांची परझड) झाली होती. त्यांचे पंचनामे प्रशासनाकडे प्राप्त झाले असुन ६ लाख ८ हजारांचे नुकसान झाले आहे अशी माहिती मोखाडा तहसीलदार मयूर खेंगळे यांनी दिली.

तर आंबा, काजू व इतर फळबाग व शेती पिकांचे कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे नजरअंदाजाने केले असून ३३ टक्के पेक्षा कमी नुकसानीखाली क्षेत्र मोखाडा तालुक्यातील २०४ शेतकऱ्यांचे ३७.९० हेक्टरवर आंबा, चिकू फळबागायतदारांचे साधारण १३ लाख ६४ हजारांचे नुकसान झालेले आहे.मात्र अशा शेतकऱ्यांचे ३३% पेक्षाकमी नुकसान क्षेत्र असल्याने त्यांना शासनाकडून मदत मिळेल याची शाश्वती नाही.मात्र असे शेतकरी पीकविमा योजनेअंतर्गत दावा करू शकतात अशी माहिती मोखाडा तालुका कृषी अधिकारी आकाश सोळुंखे यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीत फळपीक व रब्बी पिकांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाई करिता ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान क्षेत्र असल्यास लाभार्थी पात्र ठरत असल्याचा शासनाचा निकष (शासन निर्णय) आहे.मात्र वाडा व मोखाडा तालुक्यातील अनेक बाधित शेतकरी हे ३३ टक्के कमी क्षेत्राच्या नुकसानीखाली म्हणजेच २५ ते ३० % नुकसानीमद्ये बसत असल्याने शासनाकडून ३६ हजार प्रति हेक्टरी करीता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे.दरम्यान शासनाने नैसर्गिक आपत्तीत २५ ते ३० टक्के नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी शासन निकषात शिथिलता देवुन मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.