चालकांसह इतरांचाही जीव धोक्यात

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते सुरक्षा सप्ताहात भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारांना (बाईक रायडर) महामार्गावर वेगाने दुचाकी चालवू नये, अशी सक्त ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही या भरधाव दुचाकीस्वारांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. ते स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत, अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.

शनिवार-रविवारी महामार्गावर अतिवेगाने हे दुचाकीचालक आपली दुचाकी चालवत असतात. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या व महागड्या स्पोटर्र्थ्यांस दुचाकी असल्यामुळे त्यांचा वेग भरधाव असतो. छंद म्हणून दुचाकीवरून ते फेरफटका मारत असले तरी अनेक वेळेला अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी अशाच एका दुचाकीचालकाचा समूह महामार्गावरून जात असताना चारोटी हद्दीमध्ये अपघात घडून एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. महामार्गावरील मृत्युंजय दूतामार्फत त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्यामुळे तो वाचला.  अलीकडेच तीन ते चार दुचाकीचालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाही महामार्गावर धुमाकूळ काही कमी होत नाही. महामार्गावर या दुचाकीचालकांसाठी विशेष मार्गिका तयार करावी किंवा त्यांना अतिवेगाने दुचाकी वाहने चालवू नये यासाठी शासन-प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, ठाणे या भागांतून महामार्गावर हे दुचाकीचालक येत असले तरी वाहतुकीचे नियम मोडून सर्रासपणे आपल्या स्पोर्ट्स बाईक ते चालवताना दिसत आहेत.   जानेवारीमध्ये  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहांतर्गत  दुचाकीचालकांना  सक्त ताकीदही दिली होती. अनेकांवर कारवाईही करण्यात आल्या.   बाहेरून येणाऱ्या दुचाकीचालकांना येथील रस्त्याचा अंदाज नसल्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.

सुरक्षा साधने घातल्यानंतरही अतिवेगात दुचाकी चालविणाऱ्यांचा जीव जातो किंवा ते गंभीर जखमी होतात. या भरधाव दुचाकीचालकांमुळे इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे. त्यांना वेळीच थांबवणे गरजेचे  आहे. -हरबंश नन्नाडे, मृत्युंजय दूत, राष्ट्रीय महामार्ग

या भरधाव दुचाकी चालवणाऱ्यांबाबत  सगळ्या अधिकारी वर्गाची तातडीने बैठक बोलावली आहे. प्रबोधन केल्यानंतरही अशा दुचाकीचालकांचा मोठा वावर असल्याने संयुक्त कारवाई मोहीम राबवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. -मृदुला नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे पथक