आणीबाणीची ५० वर्षे: ५० वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अगदी हुकूमशहाप्रमाणे निर्णय घेतले. देशातील प्रमुख विरोधकांना तुरुंगात डांबले गेले आणि माध्यमांवरही गदा आणली. अशा सर्व घडामोडींमधील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे नसबंदीची मोहीम. देशभरात राबवलेल्या या मोहिमेमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यापैकीच एक होती चंद्रवती.

पोस्टमार्टम रिपोर्टप्रमाणे चंद्रवतीचा मृतदेह व्यवस्थित होता. त्यावर हिरवा शर्ट, पिवळा सलवार आणि लाल ओढणी, पायात चामड्याच्या चपला आणि दोन्ही हातात धातूचा कडा होता; तर उजव्या हातात काचेच्या बांगड्या होत्या. बंदुकीच्या गोळीने कवटीला फ्रॅक्चर झाल्याचाही उल्लेख रिपोर्टमध्ये होता. इंदिरा गांधी सरकारच्या सक्तीच्या नसबंदी मोहिमेविरुद्धच्या निदर्शनांना लगाम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी २ डिसेंबर १९७६ रोजी हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील पिपली या त्यांच्या गावाला वेढा घातला, तेव्हा ३० वर्षीय चार मुलांची आई चंद्रवती हिच्यासोबत काय घडले याबाबत चंद्रवतीच्या कुटुंबीयांना एवढंच सांगायचं आहे की, गेल्या ४२ वर्षांपासून ते उत्तरंच शोधत आहेत…

४२ वर्षांपासून चंद्रवती यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या मृत्यूची किंवा इतर कोणतीही नोंद नव्हती. फक्त २०१८ मध्ये त्यांनी शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी धडपड केल्यावर अखेर रिपोर्ट मिळाला. चंद्रवतीचा पुतण्या सुरेंदर सिंग याने सांगितले की, “चंदीगडमध्ये अनेक फेऱ्या माराव्या लागल्या, मुख्यमंत्र्‍यांच्या पोर्टलवर अनेक तक्रारी कराव्या लागल्या आणि प्रयत्न करत रहावे लागले.” चंद्रवतीचे नाव अजूनही कोणत्याही अधिकृत सरकारी रेकॉर्डमध्ये नाही. म्हणजेच त्या काळात अशाच परिस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जाहीर करण्यात आलेली मदत कुठल्याही कुटुंबाला मिळालेलीच नाही.

आणीबाणीदरम्यानच्या घटना आणि लोकशाही अधिकार निलंबित करण्यात आलेल्या त्या २१ महिन्यांत काय घडले, याची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती शाह आयोगाच्या मते, १९७५-७६ या आर्थिक वर्षात हरयाणासाठी सुरुवातीला ७४ हजार ३०० नसबंदीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी पूर्वीचे ध्येय अव्यवहार्य असल्याचे सांगून ते ४५ हजारांपर्यंत कमी केले. अखेर त्या आर्थिक वर्षात ५७ हजार ४९१ नसबंदी करण्यात आली.

इंदिरा गांधी सरकारच्या सक्तीच्या नसबंदी मोहिमेविरुद्धच्या निदर्शनांना रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी २ डिसेंबर १९७६ रोजी हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील पिपली गावाला वेढा घातला. या मोहिमेच्या अखेरीस आयोगाच्या म्हणण्यानुसार, नसबंदीची संख्या दोन लाख २२ हजार होती. नसबंदी केलेल्या लोकांपैकी १०५ जण अविवाहित होते आणि १७९ जण ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या निर्णयाला विरोध केल्याबद्दल हरयाणात कडक अंतर्गत सुरक्षा देखभाल कायद्यांतर्गत ४२८ जणांना अटक करण्यात आली. पिपली गावात नसबंदीच्या मोहिमेला विरोध करतानाच चंद्रवतीचा गोळी लागून मृत्यू झाला होता.

आणीबाणी आणि नसबंदी:

  • आणीबाणीच्या काळात सरकारने नसबंदी अनिवार्य करण्याचे घोषित केले
  • संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली नसबंदी कार्यक्रम राबविण्यात आला
  • अनेक ठिकाणी लोकांनी याविरोधात आंदोलन केले त्यामुळे इंदिरा गांधी सरकाची प्रतिमा मलिन झाली
  • नसबंदीच्या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, कारण लोकांच्या इच्छेविरूद्ध ते केले जात होते
  • आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विरोध पत्करावा लागला होता.

चंद्रवती यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट कुटुंबाला मिळण्यापूर्वीच त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. त्यांचा मुलगा कृष्ण सैनी, जो १९७६ मध्ये अवघ्या १८ महिन्यांचा होता, तो सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी गाडीवर चहा आणि नाश्ता विकतो. पोस्टमार्टम रिपोर्टबद्दलच्या गुप्ततेचा अंत झाल्याने न्यायासाठीचा एक लढा संपला होता. या घटनेबाबतच्या एफआयआरमध्ये फक्त अज्ञात व्यक्तींची नावे आहेत. १९८० मध्ये हे कुटुंब सुमारे चार किमी अंतरावर असलेल्या खारकोडा इथे स्थलांतरित झाले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्यांपैकी एक असलेले माजी भाजपा मंत्री राम बिलास शर्मा म्हणतात की, “तो काळा काळ होता. मला रोहतक आणि नंतर गया तुरुंगात ठेवण्यात आले.” चंद्रवतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी का याबाबत विचारणा केल्यावर शर्मा यांनी म्हटले की, “हे आमचे सरकार आहे आणि ५० वर्षे उलटली असली तरी त्यावेळी प्रभावित झालेल्यांना न्याय देण्यासाठी काय करता येऊ शकते ते पाहू.” ६४ वर्षीय बलवंत सिंग यांनी सांगितले की, त्यांचे वडील जे आता हयात नाहीत, त्यांची पिपलीमध्ये जबरदस्तीने नसबंदी करण्यात आलेल्यांमध्ये ते होते. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की, इंदिरा गांधींनी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरवर खूप दबाव आणला होता, असेही सिंग म्हणाले.

फोटो: इंडियन एक्सप्रेस

२ डिसेंबर १९७६ बद्दल बलवंत यांनी सांगितले की, “त्यावेळी लोकांच्या घरी शौचालये नव्हती, त्यामुळे ते शेतात शौचास जायचे. नंतर त्यांना तिथे लपून रहावे लागत. पहिल्या दिवशी बीडीओने सुमारे एक डझन लोकांना उचलले आणि त्यांची नसबंदी केली, हे लोकांना कळताच सर्व पुरुष पळून गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परिसराला घेराव घातला तेव्हा महिलांनी निषेध केला. संतप्त जमावाने एका पोलिसाला पकडून त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. तो लपण्यासाठी तलावात गेला, पण लोकांनी त्याला पाहिले आणि त्याला मरेपर्यंत मारहाण केली.” १०० वर्षीय रघबीर सिंग त्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत अजूनही संताप व्यक्त करतात. ते सांगतात की, “ते आले आणि आमच्या मुलांना आणि पुरुषांना उचलून ट्रकमध्ये टाकले.” त्यावेळी उंच दाट ऊसाच्या शेतांमुळे अनेक पुरुषांना लपण्यासाठी आश्रय दिला, असे सुरेंदर सिंग यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हापासून आजपर्यंत सोनीपतमध्ये बरंच काही बदललं आहे. सोनीपत आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे आणि पिपलीमध्ये एअर कंडिशनर आणि पाईप गॅस कनेक्शन सामान्य आहेत. अनेकांच्या घरात सीसीटीव्ही आहेत. इथले रहिवासी जेव्हा त्यांच्या मुलांना, नातवंडांना आणीबाणीबद्दल सांगतात तेव्हा ते खात्री बाळगतात ती, त्यांना त्या काळातील चिंता कशी होती हे कळावे. प्रशासन अधिक कार्यक्षम होते, पण ते हुकूमशाही होते. कोणालाही खात्री नव्हती की ते सुरक्षित आहेत. चंद्रवतीचे प्रकरण हे एक उदाहरण आहे. तिचा पुतण्या सुरेंद्र याने सांगितले की, “त्यांनी तिला एका अज्ञात अंधारात गायब करून टाकले. तिचे अस्तित्व पुसून टाकले, मात्र आम्ही न्यायाची वाट पाहू.”
आणीबाणीच्या काळात जबरदस्तीने लागू करण्यात आलेल्या नसबंदीने लोकांना ब्रिटीश बरे होते असं म्हणण्यास भाग पाडलं होतं