भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय ‘कारस्थानां’मध्ये नेहमीच महत्वाची यशस्वी भूमिका बजावणारे डोंबिवलीतील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावचे मूळ रहिवासी असलेले आमदार चव्हाण बालपणीच कुटुंबियांसह मुंबईत भांडूप येथे व्यवसायानिमित्त आले. भांडूप येथून चव्हाण कुटुंबीय डोंबिवलीत स्थिरावले. डोंबिवलीतून त्यांचा राजकीय प्रवास अधिकच वेगवान झाला.

पक्षाच्या विविध स्थानिक जबाबदाऱ्या सांभाळत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार असा प्रवास करत ते आता दुसऱ्यांदा मंत्री झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास विश्वास आणि मर्जीतील माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. दिलेली जबाबदारी, शब्द आणि आपला प्रत्यक्ष सहभाग न दाखवता यशस्वी करुन दाखविणे ही त्यांची खासियत. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावचा. त्यांचे बालपण मुंबईत भांडूप येथे गेले. उपजीविकेसाठी भांडूप येथे किराणा दुकान होते. २५ वर्षांपूर्वी चव्हाण कुटुंबीय डोंबिवलीत आले. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते भाजपच्या विविध आंदोलने, सभांमध्ये सहभागी होत होते. एक हरहुन्नरी उत्साही तरुण कार्यकर्ता ही त्यांची प्रतिमा होती.

डोंबिवलीत रा. स्व. संघाचे पदाधिकारी, भाजप नेते यांच्या तालमीत तयार झालेल्या रवींद्र चव्हाण यांना २००२ मध्ये कल्याण भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. या कालावधीत भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आंदोलने, मोर्चांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. या मेहनतीमधून भाजपने २००५ मध्ये रवींद्र यांना डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक पदाची संधी दिली. ते बहुमताने निवडून आले. कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना- भाजप युतीच्या काळात २००७ मध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी रवींद्र चव्हाण विराजमान झाले. या कालावधीत त्यांनी पालिकेत शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना, खासगीकरणातून प्रकल्प विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले. यामधील काही प्रकल्प मार्गी लागले तर काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे रखडले.

नगरसेवक, सभापती म्हणून प्रभावी कामे केल्याने चव्हाण यांना भाजपने डोंबिवलीतून विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली. २००९, २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये ते सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. फडणवीस सरकारच्या काळात संघाच्या बालेकिल्ल्यातील प्रभावी आमदार म्हणून २०१६ मध्ये चव्हाण यांना मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. सागरी महामंडळ, वैद्यकीय शिक्षण, मत्स्य, अन्न व पुरवठा या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

या कालावधीत त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. ही जबाबदारी पार पाडताना पालघर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये, पोटनिवडणुकांमध्ये चव्हाण यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. दोन वर्षापूर्वी प्रदेश महामंत्री म्हणून चव्हाण यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. कोणताही कौटुंबिक वारसा नसताना चव्हाण यांनी पेंडूर ते मंत्रालय असा प्रवास करून दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतल्याने कोकणासह डोंबिवलीत आनंदाचे वातावरण आहे. चव्हाण यांनी येत्या काळात कल्याण, डोंबिवलीतील रखडलेले प्रकल्प, नवीन रस्ते, उड्डाणपूल प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बंडखोरीतील गुप्त शिलेदार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या २० दिवसाच्या पडद्या मागील नाट्यात आमदार रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली. सुरत, गुवाहटी ते गोवा या प्रवासात बंडखोर आमदारांची बडदास्त आणि त्यांचे संरक्षण यामध्ये आमदार चव्हाण यांनी भाजपतील वरिष्ठ सूत्रांच्या आदेशानुसार महत्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चव्हाण यांच्यात अडीच वर्षे विकास कामांवरुन कितीही वितुष्ट आले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील एक खंदा विश्वासू समर्थक म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्री चव्हाण यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रीपदाची जी जबाबदारी देण्यात येईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेन. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सुरू असलेले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.
रवींद्र चव्हाण, मंत्री

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A confidant of devendra fadnavis and a master of behind the scenes activities print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 18:54 IST