दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच विशेष न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण- पंजाबमधील मद्य धोरणाच्या प्रकरणातही ईडीकडून चौकशी सुरू आहे.

केजरीवालांच्या अटकेनंतर शुक्रवारी पंजाब भाजपाचे प्रमुख सुनील जाखड यांनीही पंजाबमधील मद्य धोरणप्रकरणी सखोल ईडी चौकशीची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.
त्यामध्ये वित्त आयुक्त (अबकारी) के.ए.पी. सिन्हा, वरुण रुजम व नरेश दुबे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी मिळून २०२२ मध्ये पंजाबमधील मद्य धोरण तयार केले होते.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

आणखी एक योगायोग म्हणजे या धोरणांतर्गत पंजाबमध्ये मद्यविक्रीसाठी घाऊक परवाने (L1) मिळालेल्या दोन कंपन्यांचे प्रवर्तक दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आरोपी आहेत. तसेच पंजाबमधील धोरण ठरविताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी रुजम व दुबे हे दोन्ही अधिकारी उपस्थित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेही विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संदर्भात बोलताना पंजाबमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, “आमचे धोरण यशस्वी ठरले होते. त्याद्वारे आम्ही करोडो रुपयांचा महसूल जमा केला आहे. पण, केंद्र सरकार या सगळ्या बाबी कशा पद्धतीने घेते, हे येणारा काळ ठरवेल. या प्रकरणी आधीच पंजाबमधील आपच्या आमदारांवर ईडीने छापे टाकले आहेत. पुढे काय होईल, हे कोणालाही माहिती नाही.”

हेही वाचा – केजरीवाल, लालू ते जयललिता; आतापर्यंत ‘या’ ५ मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

दरम्यान या संदर्भात बोलताना, भाजपाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, “केजरीवाल यांना अटक झाली. त्याप्रमाणेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक होऊ शकते. पंजाबमधील आम आदमी पक्षाने उत्पादन शुल्क धोरण नावाने राज्यातील जनतेचे हजारो कोटी रुपये लुटले आहेत.”

त्याशिवाय अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनीही आपवर टीका केली आहे. “स्वत:ला प्रामाणिक म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्य घोटाळ्यात अटक अटक करण्यात आली आहे. आता पंजाबच्या तिजोरीला लुटणाऱ्या सर्वांना अटक करण्याची वेळ आली आहे”, असे त्या म्हणाल्या.