नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. महायुतीच्या अधिकाधिक जागा जिंकायच्या एवढेच ठरले होते. त्यामुळे कुठल्या एका पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल असे आश्वासन दिलेले नव्हते, असे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शिवसेना-शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न करत होते. अखेर या स्पर्धेतून शिंदेंनी बुधवारी माघार घेतली. मात्र पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा शिंदे गटाकडून केला गेला होता. हा दावा अजित पवार यांनी फेटाळून लावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त जागावाटपावर चर्चा झाली होती, महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>नागपुरात मंत्रिपद शहराला की ग्रामीणला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत निवडणूक लढवणार!

महाराष्ट्र, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. मात्र राष्ट्रीय पक्षाचा गमावलेला दर्जा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी अधिकाधिक राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली जाईल. आगामी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते व राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. डिसेंबरमध्ये दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.