आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले की, आम आदमी पार्टी (आप) राज्यात काँग्रेससोबत युती करणार नाही.

यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी टीएमसी काँग्रेसशी कोणत्याही चर्चेत नाही आणि त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० जागांवर एकट्याने लढेल असे जाहीर केले होते.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान काय म्हणाले?

मीडियाला संबोधित करताना भगवंत मान म्हणाले, “देश में पंजाब बनेगा हीरो, आम आदमी पार्टी १३-०.” “आप पंजाबमध्ये काँग्रेससोबत जाणार नाही”, असे ते स्पष्टपणे सांगत होते.

या महिन्याच्या सुरुवातीला भगवंत मान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेससोबतच्या युतीबाबत अंतिम निर्णय हायकमांडच घेईल, असे संकेत त्यांनी दिले होते. चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र आले.

यानंतर ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी जाहीर केले की, ही इंडिया आघाडीसोबत मिळून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरवण्याची सुरुवात आहे.

ते म्हणाले की, उमेदवारांची निवड त्यांच्या जिंकण्याच्या क्षमतेवर केली जाईल. “आम्हाला ४० संभाव्यांची यादी मिळाली असून त्यापैकी १३ जणांची निवड केली जाईल. आम्ही याचे सर्वेक्षण करू. ज्यांच्यात विजयाचे निकष पूर्ण करण्यात ते सक्षम ठरतील त्यांनाच तिकीट दिले जाईल.” या यादीत विद्यमान खासदार सुशील कुमार रिंकू यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंजाबमधील आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्वी युतीला विरोध केला. या काळात ‘आप’मधील अनेक नेत्यांना भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणांमध्ये दक्षता विभागाकडून अटक करण्यात आली होती.

विरोधी पक्ष काँग्रेसने आतापासूनच वेगवेगळ्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी देवेंद्र यादव यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकींत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युतीला विरोध केला होता. पंजाबमध्ये युती होणार नसल्याची पुष्टी काँग्रेस नेत्यांनी नाव न सांगता केली होती.

हेही वाचा : “ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पना करूच शकत नाही. कारण…”; ममतांच्या भूमिकेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. पंजाबमधून ‘आप’चा एकच खासदार आहे. ते म्हणजे जालंधरमधील सुशील कुमार रिंकू, जे लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेसाठी घेण्यात आली होती.