Bihar Assembly Elections 2025 : गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. दशकभरापासून केंद्रात एकहाती सत्ता राखणाऱ्या पक्षाला २०२४ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं. मात्र, त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपानं जोरदार पुनरामन केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. राजधानीत २७ वर्षांनंतर एकहाती सत्तास्थापन केल्यानंतर आता भाजपाने पुढील लक्ष बिहार निवडणुकीकडे वळवलं आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे नेते आतापासूनच राज्याचा दौरा करीत आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाचा डोळा?
बिहार विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पद भाजपाच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात खूपत असल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेत्यांनी अगदी उघडपणे मुख्यमंत्रिपदावरून विधाने करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं होतं. नितीश कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद आता काही मोठं राहिलं नाही, असं ते म्हणाले होते.
माजी मंत्र्यांच्या विधानाला जनता दल युनायटेडने खास शैलीत उत्तरही दिलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये कलगितुरा रंगला असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी यावर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. भाजपा नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘विजयाचा ध्वज’ फडकावतील, असं सैनी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानानंतर जनता दल युनायटेडचे नेते आक्रमक झाले असून भाजपानं या विधानावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी ते करीत आहेत.
आणखी वाचा : Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात कुणाचा हस्तक्षेप?
काय म्हणाले मुख्यमंत्री नायब सिंग सैनी?
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ऑल इंडिया सैनी सेवा समाजातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच राज्यसभेचे खासदार उपेंद्र कुशवाहा आणि कल्पना सैनी उपस्थित होते. “भाजपाचा विजयमार्च हरियाणातून बिहारकडे सुरू होईल. बिहारमध्ये विजयाचा ध्वज सम्राट चौधरी यांच्या हस्ते फडकवला जाईल,” असं विधान नायब सिंग सैनी यांनी कार्यक्रमात केलं.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाची भाजपाकडून सारवासारव
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे बिहारमध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी भाजपाच्या हरियाणा युनिटने या संदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही, तसेच त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हरियाणा भाजपाचे मीडिया समन्वयक संजय आहुजा म्हणाले, “मुख्यमंत्री सैनी यांच्या विधानाचा अर्थ इतकाच आहे की, एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन करेल. मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार हे एनडीएचे नेते एकत्र बसून ठरवतील. सध्या आमचे लक्ष निवडणुका लढवण्यावर आहे. प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य मानतो, यात काहीच दुमत नाही.”
‘बिहारमध्ये ताज्या दमाचा मुख्यमंत्री येणार’
बिहार भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचा दावा पप्पू यादव यांनी केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. आरजेडीप्रमुख तेजस्वी यादव सोमवारी माध्यमांबरोबर संवाद साधताना म्हणाले, “भाजपामधील अनेक नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत, त्यामुळे जेडीयूने आपल्या मित्रपक्षाकडून (भाजपाकडून) स्पष्टीकरण मागितलं पाहिजे. पण, बिहारमध्ये नवीन आणि ताज्या दमाचा मुख्यमंत्री येणारच.” तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सत्तेला ‘२० वर्ष जुनी झालेली गाडी’ असं म्हणत राज्यात सत्तापरिवर्तनाची गरज असल्याचं सूचित केलं.
हेही वाचा : भाजपा आणि काँग्रेस सारख्या राजकीय पक्षांना निधी देणारे देणगीदार कोण? निवडणूक आयोगाची आकडेवारी काय सांगते?
भाजपाचे नेते मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर बिहारमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, “आम्ही याआधी अनेक वेळा म्हटलंय की, आगामी विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल, याबाबत कोणताही संभ्रम नाही.” दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सध्यातरी स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ठेवलं आहे. “नितीश कुमार हेच एकमेव मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत आणि येणाऱ्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बिहारच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. मात्र, त्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. बिहारमध्येही भाजपा हाच पॅटर्न राबवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जेडीयूकडून भाजपाची कानउघाडणी?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात बिहारचा दौरा केला होता, त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन जनता दल युनायटेडने भाजपा नेत्यांची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. “अमित शाहांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आधीच निर्णय घेतला आहे. याबाबत इतर नेते काय बोलतात याला फारसं महत्त्व नाही. मात्र, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे,” असं जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांनी म्हटलं आहे. बिहारची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे, त्याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेते मुख्यमंत्रिपदावरून दावे-प्रतिदावे करीत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण असणार, याकडेच सर्वांच्या नजरा लागून आहेत.