Malappuram loksabha candidate Dr. Abdul Salam भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केरळमधील १२ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. आपल्या पहिल्या यादीत भाजपाने केरळमधील मलप्पुरममधून एम. अब्दुल सलाम यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या लोकसभा यादीतील हा एकमेव मुस्लिम चेहरा आहे. केरळमधील कालिकत विद्यापीठाचे माजी कुलगुरू सलाम यांची २०११ मध्ये, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) राज्यात सत्तेवर असताना काँग्रेस सहयोगी इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) नियुक्ती केली होती.

भाजपाने त्यांना मुस्लिमबहुल मलप्पुरम जागेवरून उमेदवारी दिली आहे. या जागेवर आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर आणि सीपीआय(एम) चे व्ही. वासीफ त्यांचे प्रतिस्पर्धी असतील. सलाम म्हणाले की, भाजपाच्या पहिल्या यादीत स्थान मिळविणारा एकमेव मुस्लिम असल्याचा मला आनंद आहे. मी माझ्या उमेदवारीबद्दल बातम्यांमधून ऐकले. मलप्पुरममधून पक्षाने मला पाठिंबा दिला आहे आणि पक्ष माझ्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

कोण आहेत अब्दुल सलाम?

डॉ. अब्दुल सलाम हे एक प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ आहे. २०१९ मध्ये सलाम यांनी भाजपात प्रवेश घेतला. केरळ युनिटचे नेतृत्व पी.एस. श्रीधरन पिल्लई करत असताना, अधिकाधिक अल्पसंख्याक चेहऱ्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करण्याचा त्यांचा मानस होता. तेव्हाच सलामदेखील भाजपाबरोबर आले आणि भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. केरळमधील २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, सलाम यांनी तिरूरमधून निवडणूक लढवली होती, परंतु या निवडणुकीत आययूएमएल च्या कुरुकोली मोईदीनकडून त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत त्यांना केवळ ५.३३% मते मिळाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मलप्पुरम मतदारसंघ हा इंडियन युनियन मुस्लिम लीगचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपाचे ए.पी. अब्दुल्लाकुट्टी गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर होते.

कालिकत विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू

कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सलाम यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. त्यांनी २०११ ते २०१५ पर्यंत कलिकत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. या कार्यकाळात अब्दुल सलाम यांना विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निषेधाचा सामना करावा लागला होता. मुख्य म्हणजे सीपीआय(एम) संलग्न विद्यार्थी संघटनांशी त्यांचा वाद होता. निषेध सुरू असताना २०१४ मध्ये त्यांच्या एका परिपत्रकाने खळबळ उडाली होती. या परिपत्रकात सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना त्यांच्या कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या या भूमिकेला महिला विरोधी म्हणून संबोधले गेले होते. यासह विद्यापीठाची जमीन कथितपणे विकणे आणि काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानेदेखील वाद निर्माण झाला होता. सलाम अद्यापही कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित सहा खटले लढत आहेत.

हेही वाचा : इंडिया आघाडीत बिघाडी? नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील तिन्ही लोकसभा लढविणार, इतर पक्षांचे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सलाम म्हणाले की, ते आययूएमएल किंवा सीपीआय(एम) च्या विरोधात नाहीत. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा विरुद्ध होत असलेला खोटा प्रचार थांबवणे आणि याची जाणीव गरीब, निरपराध मुस्लिमांना करून देणे माझे काम आहे. मलप्पुरममध्ये मुस्लिमांच, विशेषत: सुशिक्षित लोकांचा भाजपाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल दिसून येत आहे,” असे ते म्हणाले.