Delhi Assembly Election: दिल्लीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ५ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून सत्ताधारी ‘आप’ आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपाला २७ वर्षांनी सरकार स्थापन करण्याचे वेध लागले आहेत. १९९३ ते १९९८ या काळात भाजपाने दिल्लीत सरकार स्थापले होते. यावेळी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. याचे कारण काय? तसेच प्रतिस्पर्धी आप आणि भाजपात आश्वासनांची खैरात का वाटली जात आहे, याबद्दलची माहिती भाजपाचे ईशान्य दिल्लीतील खासदार आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत दिली.

प्र. या निवडणुकीत भाजपाला विजय मिळेल, अशी शक्यता वाटते का?

तिवारी : लोकांकडून जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, तसेच पक्षात नाराज असलेला गटही यंदा आम्हाला पाठिंबा देत आहे, त्यामुळे २७ वर्षांनंतर आम्ही दिल्लीत सत्ता स्थापन करू शकू, असा विश्वास वाटतो. दिल्लीतील जनतेचा भाजपावरील विश्वास वाढल्याचे आम्हाला दिसले.

प्र. इतर पक्षात मुख्यमंत्रिपदाबाबत फार गोंधळ पाहायला मिळत नाही, पण भाजपाच्याबाबत गोंधळ आहे असे दिसले.

तिवारी : नाही, कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे केलेला नाही, त्याप्रमाणेच भाजपानेही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला नाही. निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू. भाजपामध्ये ही जुनी पद्धत आहे. एवढेच काय, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्याआधी त्यांचाही चेहरा जाहीर झालेला नव्हता. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले गेले नव्हते. भाजपा नेहमी एकत्र येऊन निवडणूक लढविण्यावर भर देतो आणि त्यानंतरच मुख्यमंत्री निवडला जातो. तो जो कुणी असेल, तो पक्षाचा कार्यकर्ता असेल हे मात्र नक्की.

प्र. तुमच्या पक्षातील काही उमेदवारांनी अलीकडे केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल काय?

तिवारी : त्या वादग्रस्त टिप्पण्यांना आमच्या पक्षात स्थान नाही. कधी कधी काही लोक चुकून बोलून जातात किंवा अतिउत्साहात बोलून बसतात, जे पक्षाच्या तत्वात आणि संस्कृतीमध्ये बसत नाही. अशावेळी पक्ष ताबडतोब कारवाई करून त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगतो. पण, त्याचवेळी इतर पक्षातील उदाहरणे पाहा. जसे की, अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याबरोबर गैरवर्तणूक झाली, त्याबद्दल त्यांच्यातील कुणी दिलगिरी व्यक्त केली का?

प्र. दिल्लीसाठी भाजपाचे व्हिजन काय आहे?

तिवारी : भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास पुढील पाच वर्षांसाठी दिल्लीतील दुर्बल घटकांतील महिलांना सरकारकडून प्रति महिना २५०० रुपये दिले जातील. गर्भवती महिलांना २१ हजार, प्रत्येक आर्थिक मागास कुटुंबाला ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर दिला जाईल. तसेच गरीब नागरिकांना १० लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. तसेच दिल्लीला सुंदर शहर बनवत असताना शहरातील तीन कचऱ्याचे डोंगर हटवू.

प्र. ‘आप’ने पूर्वांचल समाजातील डझनभर उमेदवारांना तिकीट दिले आहे, तर भाजपाने केवळ काही जणांना; यावर समाधानी आहात?

तिवारी : तिकीट वाटप हा विषय त्या त्या परिस्थितीनुसार आणि इतर समीकरणे पाहून घ्यावा लागतो. कधीकधी हे निर्णय चुकीचे ठरतात, असे निर्णय प्रत्येकवेळी बरोबर असतातच असे नाही. पण, यावेळी तिकीटवाटप योग्य पद्धतीने झाले असल्याचे मला स्वतःला वाटते. एक-दोन ठिकाणी आणखी सुधार करता आला असता. केवळ एक-दोघांच्या महत्त्वाकांक्षेवर तिकीट दिले जात नाही, त्यासाठी इतर अनेक घटक पाहावे लागतात.

प्र. तुम्ही ‘आप’वर मोफत रेवडी वाटपाचा आरोप करता. पण, तुम्हीही त्यांच्या योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेसनेही अशाच प्रकारची आश्वासने दिली आहेत; तर मग फरक काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिवारी : आम्ही कधीच मोफत रेवडी म्हणत नाही. मोफत आणि रेवडी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रेवडी वाटणे म्हणजे, “तुम्ही सांगितले एक आणि केले दुसरेच. तुम्ही जे सांगितले ते केलेच नाही”, या वर्णनाला रेवडी वाटणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. आम्ही मोफत देण्याच्या कधीही विरोधात नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला खूप मोफत संसाधने दिली आहेत. २०१४ नंतर गरिबांना पाच लाख रुपयांचे मोफत उपचार मिळू लागले आहेत. गरिबांना मोफत रेशन मिळत आहे. ५५ कोटी मोफत बँक खाती उघडली गेली आहेत. आम्ही मोफत घरे आणि शौचालये दिली, कारण या सर्व मूलभूत गरजा आहेत. भाजपा ज्या गोष्टींचे वचन देते, त्याच गोष्टी जनतेला दिल्या जातात.