आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पुढील काही महिन्यांमध्ये देशातील पाच प्रमुख राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस आणि भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश नंतर भाजपाने आता राजस्थानमधील कमकुवत असलेल्या मतदारसंघाची यादी तयारी केली. भाजपाने मागच्या काही निवडणुकांमध्ये या मतदारसंघात विजय मिळवलेला नाही. त्यामुळे या जागांवर थोडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी भाजपा नेतृत्व वेगळी रणनीती आखत असल्याची माहिती द प्रिंट या संकेतस्थळाने दिली आहे. या जागांवर विजय मिळवण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे विद्यमान खासदार आणि काँग्रेसमधून आलेल्या बंडखोरांची मदत घेतली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ प्रमाणेच राजस्थानमधील मतदारसंघाची वर्गवारी करण्यात आली आहे. राजस्थानमधील ५० मतदारसंघाची यादी तयार करण्यात आली आहे, ज्यापैकी १९ जागांवर आजवर कधीही विजय मिळवता आलेला नाही. तसेच इतर जागांवर भाजपाची फारशी ताकद नाही. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०० जागांपैकी ७३ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला ९९ जागा जिंकण्यात यश मिळाले होते. तर १३ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. हे वाचा >> वसुंधराराजेंकडे कोणती जबाबदारी? राजस्थानमध्ये भाजपपुढे पेच? राजस्थान विधानसभेच्या नवलगड, बस्सी, टोडाभीम, झुन्झुनू आणि कोटपुतली या मतदारसंघात भाजपाची फारशी ताकद नसल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. "भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने खासगी संस्थाकडून केलेला सर्व्हे आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून मागितलेल्या अहवालावरून ५० मतदारसंघाची यादी तयार केली. ज्याठिकाणी भाजपाला जरा अधिकची ताकद लावावी लागणार आहे. भाजपामधील एका वरीष्ठ नेत्याने सांगितले की, या मतदारसंघात भाजपाने काम सुरू केले असून वेगवेगळ्या रणनीतीचा अवलंब केला जात आहे. यावेळी जास्तीत जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रादेशिक पक्ष, काँग्रेसच्या बंडखोरांना उमेदवारी आणखी एका नेत्याने सांगितले की, मागच्या आठवड्यात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या यादीसह राजस्थानच्या १९ जागांची घोषणा केली जाणार होती. मात्र पक्षाच्या प्रचार समितीने त्यावर वेळेत निर्णय न घेतल्यामुळे यादी जाहीर करण्यास विलंब झाला. "कमजोर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाचे विद्यमान खासदार, काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षातील बंडखोर नेते किंवा त्या त्या मतदारसंघातील लोकप्रिय चेहऱ्यांना आणि जनतेमध्ये विश्वास असलेल्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते", अशी प्रतिक्रिया भाजपामधील सूत्रांनी दिली. या सर्व मतदारसंघात काँग्रेसला शह देण्यासाठीही विचार केला जात आहे. ५० मतदारसंघातील स्थानिक मुद्दे काय आहेत? त्यावरून सत्ताधारी काँग्रेसवर कशापद्धतीने हल्ला चढविता येऊ शकतो? याचाही विचार भाजपाच्या बाजूने केला जात आहे. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, छत्तीसगढमध्येही पक्षाने कमकुवत जागांवर विद्यमान खासदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी टक्कर देता येईल. हे वाचा >> सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू जुण्यांची गच्छंती, नव्या नेत्यांना संधी राजस्थान निवडणुकीबाबत भाष्य करताना भाजपा नेत्याने सांगितले की, यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्व प्रयत्नशील आहे. जे नेते मागच्या टर्मपासून आमदार आहेत, त्यांच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. तथापि, त्याठिकाणच्या जुन्या, अनुभवी आमदाराला पक्ष संघटनेत इतर जबाबदारी देऊन त्यांच्या अनुभवाचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती भाजपा नेत्याने द प्रिंटशी बोलताना दिली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील विधानसभेचा प्रचार करण्यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील भाजपा आमदारांना पाचारण करण्यात आलेले आहे. शनिवारी (दि. १९ ऑगस्ट) चारही राज्यांत विविध राज्यातील आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघ प्रवास योजनेद्वारे या आमदारांना विविध मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे.