मंगळवारी जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाची पहलगाम येथे बैठक झाली. गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांची हत्या झाली होती. पहलगाम या पर्यटनस्थळाबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पर्यटन हे संघर्षमुक्त असावं आणि सरकार या प्रदेशातील संघर्षरहित घडामोडींपासून ते वेगळे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील.

जम्मू-काश्मीरमधील दुहेरी सत्ताकेंद्रे, त्यांचे सरकार आणि उपराज्यपाल यांच्या आव्हानांचा उल्लेख करताना ओमर म्हणाले, “तीन सरकारांनी (या दोन संस्था आणि केंद्र) यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. पर्यटन ही माझी जबाबदारी आहे; मात्र पर्यटकांची सुरक्षा ही माझी जबाबदारी नाही.” ते पुढे म्हणाले, “जम्मू व काश्मीरचं निवडून आलेलं सरकार, जम्मू व काश्मीरचं निवडून न आलेलं सरकार आणि केंद्र अशा तीन सरकारांना येथे एकत्र काम करावं लागेल.”

जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी राज्य केंद्राशी चर्चा करीत आहे.

“आमच्यासाठी पर्यटन हा एक आर्थिक स्रोत आणि उपजीविकेचं साधन आहे. दुर्दैवानं येथील परिस्थितीचा पर्यटनावर परिणाम होतो. मात्र, या अडचणी सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जगाने पर्यटनाकडे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आर्थिक स्रोत म्हणून पाहावे, अशी आमची इच्छा आहे”, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

“गेले काही आठवडे देशासाठी सोपे नव्हते हे मला माहीत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरवर सर्वाधिक परिणाम झाला आहे”, या शब्दांत ओमर यांनी चिंता व्यक्त केली. “पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पावलं उचलण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की, केंद्राला आमच्याकडून जे काही सहकार्य हवं असेल, ते आम्ही देऊ”, असेही ओमर पुढे म्हणाले.

“पंतप्रधानांनी पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक बैठक घेतली होती. त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पर्यटनमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी नीती आयोगाच्या बैठकीत मला पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन कसं पुनरुज्जीवित करता येईल यावर आम्ही चर्चा केली. मी ते आता जाहीर करू शकत नाही. मात्र, काही ठोस पावलं उचलली जातील”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रिमंडळाचा पहलगाम दौरा हा प्रशासकीय नाही, तर तो लोकांना सुरक्षिततेची भावना देण्यासाठी असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. “पहलगाम येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही केवळ एक नियमित प्रशासकीय बैठक नव्हती, तर तो एक स्पष्ट संदेश होता. जम्मू आणि काश्मीर खंबीर, मजबूत व निर्भय आहे”, असेही त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांसाठी बंद केलेली पर्यटनस्थळे उघडण्याची मागणीही ओमर अब्दुल्ला यांनी केली. “बैसरन हल्ल्यानंतर पर्यटनस्थळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा ऑडिटनंतर ती हळूहळू खुली केली जातील आणि ती खुली झाली पाहिजेत”, असे ओमर यांनी सांगितले. “मी येथील लोकांना भेटलो आणि पर्यटकांनीही मला सांगितले की, ते स्वतःहून आले आहेत”, असे सांगून ते पुढे म्हणाले की, बैसरन बंद ठेवता येईल; पण बेताब खोरे आणि अरू खोरे सुरू झाले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्ल्यानंतर ४८ ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामध्ये श्रीनगरमधील बदामवारी व ट्यूलिप गार्डन यांचा समावेश होता. “जर ट्यूलिप गार्डन बंद करणे आवश्यक असेल, तर आपल्याला संपूर्ण काश्मीर बंद करावे लागेल”, असे ओमर म्हणाले. “सोनमर्गमधील बेताब खोरे, अरू खोरे, थाजीवास हिमनदी ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यासाठी चर्चा सुरू आहे. आपल्याला थोडे धाडस दाखवावे लागेल आणि हळूहळू ही ठिकाणे खुली करावी लागतील”, असे ओमर यांनी स्पष्ट केले. “अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पडली, तर पर्यटक काश्मीरमध्ये परत येण्यास मदत होईल, अशी आशा लोकांनी व्यक्त केली”, असेही ते म्हणाले.