छत्रपती संभाजीनगर : कधीही लोकसभा निवडणूक न लढविलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गेल्या १६ महिन्यांपासून तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांना गेल्या आठवड्यात ‘ही जागा शिवसेनेची’ असल्याचा सल्ला दिला गेला. त्यामुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इच्छुक हिरमुसले होते. मात्र, पुन्हा एकदा ही जागा सोडवून घेण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली.

राजकीय सर्वेक्षणातून तसेच आतापर्यंत केलेल्या कामाच्या आधारे ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला देऊ नये, असा त्यांनी आग्रह धरला. आतापर्यंत केलेल्या कामाच्या आधारे भाजपसाठी चांगले वातावरण असल्याने ही जागा भाजपला सुटावी, असा आपला आग्रह आहे, तो मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि जिल्ह्यात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला राम राम केला. मात्र, या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांविषयी सहानुभूती निर्माण झाली. त्याला ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणेची साथ मिळाली. त्यामुळे याच काळात भाजपने छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली. सोळा महिन्यांपासून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बैठकांना सुरुवात केली. प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांना काम देण्यात आले. हे काम एवढे होते, की कार्यकर्तेही वैतागून गेले. चोवीस तास कमी पडतील, एवढी रचना लावून झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडे दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

विनोद पाटील किंवा संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यावरूनही चर्चा सुरू झाली आणि भाजपचे नेते अस्वस्थ झाले. आता पुन्हा शेवटचा जोर मारून पाहू, असे म्हणत डॉ. कराड हे पुन्हा मुंबईत धडकले आहेत. जागा भाजपला हवी, अशी मागणी त्यांनी पुन्हा पुढे रेटली. मात्र, अजून निर्णय न झाल्याने भाजपचे नेते आता ‘जागा सोडवून घ्या’ असा विनवणीचा सूर आळवू लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे कोणती भूमिका घेतात यावर सारी गणिते अवलंबून आहेत.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

धाराशिवमधील जागेबाबतही भाजपची मंडळी याच विनवणीच्या सुरात आता बोलू लागले आहेत. साऱ्यांची भिस्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याने चला फडणवीस भेटीला जाऊ असे सत्र सुरू झाले आहे.