अलिबाग- माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील जनाधार असलेला आणखी एक नेता पक्ष सोडून गेला. या साऱ्या घडामोडींमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यातील पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष करण्याचे पक्षश्रेष्टींचे धोरण संघटनेच्या मुळावर आले आहे.

आधी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पनवेल तालुक्यातील पक्षसंघटना अडचणीत आली. नंतर माजी मंत्री रविंद्र पाटील भाजपात दाखल झाले. त्यामुळे पेण विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत महाड विधानसभा मतदारसंघात पक्षाने अस्तित्व टिकून ठेवले होते. मात्र माणिक जगताप यांच्या निधनानंतर मतदारसंघातील पक्षाची धुरा संभाळणाऱ्या स्नेहल जगताप शिवसेना ठाकरे गटात दाखल झाल्या. त्यामुळे महाडच्या पक्षसंघटनेला घरघर लागली.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातही माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर पक्षाची वाताहत सुरू झाली. स्थानिक पातळीवर कट्टर विरोधक असलेल्या शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण पक्षाच्या वाताहतीला कारणीभूत ठरले. सघटनेतील मदभेद, विसंवाद आणि उदासिनता यामुळे जुने जाणते कार्यकर्ते पक्षापासून दुरावत गेले. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यानंतर तेथील पक्षसंघटनेलाही उतरती कळा लागली होती. अशावेळी मुश्ताक अंतुले हे पक्षासाठी आशेचा किरण होते. मतदारसंघात अंतुले नावाला असलेले वलय आणि मतदारसंघात अल्पसंख्याक मतांची मोठी संख्या यामुळे मुश्ताक अंतुले यांचे पक्षातील स्थान अनन्यसाधारण होते. आता तेही पक्षाला सोडून गेल्याने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करू शकणारा आणि जनाधार असलेला नेता उरलेला नाही.

हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?

हेही वाचा – इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. पक्षाचे तीन – तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत. माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या पश्चात पक्षाची वाताहत सुरु झाली. देशपातळीवर आणि राज्यपातळीवर स्वताचे स्थान निर्माण करू शकेल असे नेतृत्व काँग्रेसला घडवता आले नाही. माणिक जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्या पश्चात दुसरी फळी तयार होऊ शकली नाही. त्यामुळे वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे पक्षाच्या संघटनेची वाटचाल सुरु झाली आहे. पक्षाचे कोकणातील संघटनेबाबत असलेले उदासिन धोरण याला कारणीभूत ठरत आहे. आधी लोकसभा, नंतर विधानसभा आणि शेवटी जिल्हा परिषद पातळीवरून पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले. पक्षाला एक संघ बांधून ठेवेल आणि संघटना टिकवून ठेवेल असे नेतृत्व पक्षाकडे शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात पक्षाची आणखी वाताहत झाली तर नवल वाटणार नाही.