पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांबाबत राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेसने रविवारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या पर्यटकांनी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते. ज्या महिलांनी आपले पती गमावले; त्यांच्यात योद्ध्यासारखा उत्साह व जोश नव्हता म्हणूनच २६ लोक हल्ल्याचे बळी ठरले, असे वादग्रस्त विधान जांगडा यांनी केले. रामचंद्र जांगडा कोण आहेत? त्यांनी आपल्या विधानात नक्की काय म्हटले? काँग्रेस नेत्यांनी भाजपावर कसा हल्ला चढवला? त्याविषयी जाणून घेऊ.
रामचंद्र जांगडा काय म्हणाले?
हरयाणामधील भिवानी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात रामचंद्र जांगडा बोलताना म्हणाले, “पहलगाम हल्ल्यामध्ये पती गमावलेल्या आमच्या बहिणींमध्ये लढा देण्याची वृत्ती, जिद्द व जोश नव्हता. त्यामुळे त्या बळी ठरल्या. हात जोडून विनंती करणाऱ्यांना दहशतवादी सोडत नाहीत. आपली माणसे हात जोडून मरण पावली”, असे ते म्हणाले.
काँग्रेस आक्रमक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रामचंद्र जांगडा यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले, “भाजपाचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांच्या लज्जास्पद विधानाने पुन्हा एकदा संघ-भाजपाची क्षुद्र मानसिकता उघडकीस आणली आहे. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी आपल्या शूर सैन्याचा अपमान केला; परंतु पंतप्रधान मोदींनी कोणतीही कारवाई केली नाही. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी आपल्या शूर कर्नलवर अश्लील टिप्पणी केली; परंतु त्यांना आजपर्यंत बडतर्फ करण्यात आलेले नाही” खरगे यांनी पुढे म्हटले. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असतानाही मोदीजी गप्प होते. नरेंद्र मोदीजी तुम्ही म्हणता की, तुमच्या नसांमध्ये सिंदूर आहे. जर तसं असेल, तर महिलांच्या सन्मानासाठी तुम्ही तुमच्या या वाईट बोलणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करावी,” असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी आरोप केला की, भाजपा नेते लष्कराचा आणि पहलगाममध्ये मारल्या गेलेल्यांचा सतत अपमान करत आहेत. “या विधानांनी त्यांची क्षुद्र आणि नीच मानसिकता उघड होते,” असे ते म्हणाले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “जांगडा यांचे लज्जास्पद विधान दर्शविते की, सत्तेच्या नशेत असलेला भाजपा इतका असंवेदनशील झाला आहे की, पहलगाममध्ये सुरक्षेतील त्रुटींना दोष देण्याऐवजी भाजपा खासदार शहीद आणि त्यांच्या पत्नींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.” .
जयराम रमेश म्हणाले, भाजपाने विजय शाह आणि जगदीश देवदा यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. हे नवीन विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांनी पुढे म्हटले, “पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेतृत्वाचे मौन ही या विधानांना दिलेली मूक मान्यता का मानू नये? आमची स्पष्ट मागणी आहे की, पंतप्रधान मोदींनी या लज्जास्पद विधानाबद्दल माफी मागावी आणि खासदार रामचंद्र जांगडा यांना पक्षातून काढून टाकावे.”
रामचंद्र जांगडा हे केंद्रीय मंत्री व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नजीकचे मानले जातात. रामचंद्र जांगडा यांनी कर्नालमध्ये पत्रकारांना सांगितले की, “जांगडा यांनी भावना व्यक्त केल्या; परंतु त्या चुकीच्या संदर्भात मांडण्यात आल्या. पती गमावलेल्या महिलांबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही. ही खरोखरच चूक होती आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मला वाटते की, या मुद्द्यावर आता बोलणे थांबवायला हवे”, असे ते म्हणाले.
कोण आहेत रामचंद्र जांगडा आणि त्यांच्याभोवतीचे वाद काय?
जांगडा यांच्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी २०२० ते २१ मध्ये दिल्ली सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० मुली बेपत्ता झाल्याचा आरोप केला होता. त्यासाठी पंजाबमधील अमली पदार्थांचे व्यसनी कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये निषेधादरम्यान संतप्त शेतकऱ्यांच्या एका गटाने हिसार जिल्ह्यात जांगडा यांच्या वाहनावर हल्ला केला; परंतु, पोलिसांनी त्यांना वाचविले.
जांगडा हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायातील आहेत आणि २०१५ मध्ये त्यांना राज्यातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी कल्याणकारी मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मार्च २०२० मध्ये जांगडा यांना भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून निवडण्यात आले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ते गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार समिती, हिंदी सल्लागार समिती, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयासाठी सल्लागार समिती व अधिकृत भाषा समितीचे सदस्य आहेत. वरिष्ठ सभागृहात त्यांची उपस्थिती ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी आतापर्यंत ११५ हून अधिक वादविवादांमध्ये आपला सहभाग दर्शविला आहे.
रामचंद्र जांगडा यांचा जन्म ८ मे १९५० रोजी रोहतकमधील मेहम येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी लोकदल (बहुगुणा) या पक्षामधून राजकीय प्रवास सुरू केला. १९८७ मध्ये सफिदोन येथून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली; परंतु त्यांचा पराभव झाला. १९९१ मध्ये त्यांनी बन्सीलाल यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा विकास पक्षाच्या (एचव्हीपी) तिकिटावर मेहम येथून आणि २००४ मध्ये पुन्हा कर्नाल येथून निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. एचव्हीपी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर रामचंद्र जांगडा भाजपामध्ये सामील झाले.
त्यांना पक्षाच्या ओबीसी शाखेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २०१४ मध्ये गोहाना येथून पुन्हा विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले; परंतु, त्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. पाच वर्षांनंतर जांगडा पुन्हा गोहाना येथून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत होते; परंतु पक्षाने तीर्थ राणा यांना तिकीट दिले. राणादेखील त्या निवडणुकीत अपयशी ठरले. पुढच्या वर्षी पक्षाने जांगडा यांना संसदेत पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर जांगडा यांनी स्वतःचे वर्णन ‘पक्षाचा खरा सैनिक’ म्हणून केले.