पुणे : बारामतीवर एकहाती हुकुमत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षाही इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप-शिवसेना (शिंंदे) या मित्रपक्षांनीच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दगाफटका झाल्याने इंदापूरकरांचा धसका घेतलेल्या अजित पवार यांना लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘रस्त्यावर’ उतरावे लागले आहे.

इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखांना अजित पवार यांच्या ताब्यात आहे. मात्र, हा कारखाना डबघाईला आला आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अजित पवार यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले. कारखान्यातील पारंपरिक विरोधक, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनाच त्यांनी आपल्या गोटात घेतले. त्यांना पॅनेलचे प्रमुख केले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने विरोधी बाकावर कोणीही नसेल, असे चित्र निर्माण झाले. सर्वचजण सत्तेत जाणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली. २१ जागांच्या या निवडणुकीसाठी तब्बल ६०० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अजित पवार यांनी स्वत: इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, सर्वांनाच न्याय न मिळाल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे) या महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे अजित पवार यांंची कोंडी झाली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या ‘श्री जय भवानी माता पॅनल’ विरोधात भाजपचे स्थानिक नेते तानाजी थोरात यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या इच्छुकांना बरोबर घेऊन तयार केलेल्या ‘श्री छत्रपती बचाव पॅनेल’ने आव्हान उभे केले आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना इंदापूरकरांनी दगाफटका दिला. त्यामुळे या भागातून खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीपेक्षा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. पवार हे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची भूमिका निर्णायक

या कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माघार घेत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे मतदार या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष तटस्थ राहिला असला, तरी ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणता संदेश जाणार, यावर या कारखान्याचा ‘निकाल’ अवलंंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारखान्याशी भावनिक नाते

उपमुख्यमंंत्री अजित पवार यांंचे या कारखान्याशी भावनिक नाते आहे. राजकारणात कोणतीही ओळख नसताना वडील अनंतराव पवार आणि चुलते आप्पासाहेब पवार यांच्यामुळे या कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाल्याची आठवण ते प्रचारात सांगत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नावलौकिक मिळण्यात या कारखान्याच्या सभासदांंचा मोठा वाटा असल्याचेही ते कबूल करतात, त्यामुळे या भावनिक प्रचाराचा मतदारांवर कोणता परिणाम होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.