छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील भाजपच्या विजयानंतर राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते हतबल झाले आहेत. उसने अवसान आणण्यासाठीही बळ मिळत नसल्याने करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील कर्नाटकात कॅबिनेट मंत्री झाले. ते कर्नाटकात रमले. त्यानंतर काँग्रेस पक्षात कोणतेही नवे बदल झाले नाहीत. काँग्रेसने बहुतांश पदे विदर्भातील नेत्यांकडे दिलेली आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यपदी नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत तसेच महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे पदही विदर्भाकडे असल्याने मराठवाड्यातील काँग्रेसने उसने अवसान आणायचे जरी ठरविले तर त्याचा बळ कोठून मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कुपोषित संघटन शक्तीपुढे भाजपची आक्रमक यंत्रणा असे चित्र आता दिसू लागले आहे. हेही वाचा - आठ कोटींमुळे भाजपाच्या खासदार किरण खेर वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय? शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर असे चार मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले. पण काँग्रेसची अवस्था सध्या अक्षरश: कुपोषित झाली आहे. ज्यांना ताकद दिली ते काँग्रेस संघटनेच्या कामात फारसे लक्षच घालत नसल्याचीही कार्यकर्त्यांची तक्रार कायम आहे. बीडच्या रजनीताई पाटील यांना राज्यसभा देण्यात आली. त्यामुळे बीडच्या काँग्रेस संघटनेला बळ मिळाले नाही. हिंगोलीमध्ये दिवंगत नेते राजीव सातव यांच्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषद मिळाली. मात्र, त्यांच्यामुळे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नवे वाद सुरू झाले. भारत जोडो यात्रेच्या वेळी यात्राप्रमुख बाळासाहेब थोरात यांना ते सोडवावे लागले. जालन्यातील विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांचा संपर्क फक्त समाजातील काही मोजक्याच व्यक्तींबरोबरचा. त्यामुळे पक्षवाढीसाठी ते कोठेच उपयोगी पडत नसल्याचेही आवर्जून सांगण्यात येते. ज्यांना नेता म्हणून चेहरा आहे ते अशोकराव चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याकडे पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नसल्याने ते आता लातूर आणि नांदेड जिल्ह्यात आपले आणि आपल्या समर्थकांचे मतदारसंघ बांधण्यापलिकडे लक्ष घालत नाहीत. परिणामी आता उसने अवसान जरी आणायचे तरी बळ कोणाचे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रभारींचा पेच कायम मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून एच. के. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. कर्नाटक निडणुकीनंतर गदग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटील यांना कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आता ते तिकडे रमले आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रभारीपदाचा पेच काही सुटलेला नाही. नव्याने कोणी नेता प्रदेश काँग्रेसचे काय चालले आहे, हे विचारत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मोठ्या आंदोलनातील गर्दी अलिकडे १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नसते. फारच मोठा नेता येणार असेल तर मुस्लिम महिलांना आवर्जून आणले जाते. पण ही गर्दीही ५०० हून अधिक जणांची नसते. त्यामुळे वरपासून ते खालपर्यंत आपण बळ कोठून मिळवावे, या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. हेही वाचा - पोटनिवडणुकीवरून पुण्यातील राजकीय पक्षांमध्ये संभ्रम अमित देशमुख फक्त लातूरपुरते लातूर शहर आणि ग्रामीण या दोन मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व. मात्र जिल्ह्यात अमित देशमुख यांचे नेतृत्व आता सर्वमान्य राहिलेले नाही. लातूर भाजपमध्ये कुरघोड्यांचे खेळ रंगलेले असले तरी जिल्ह्यावर काँग्रेसची पकड नाही. मात्र, युवकांमध्ये आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची छाप अमित देशमुख यांच्या बोलण्यातून दिसत असल्याने मराठवाड्यात त्यांचे चाहते आहेत. मात्र, त्यांनी मराठवाड्यातील काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पक्ष पातळीवरूनही पक्ष विस्ताराची जबाबदारी त्यांच्यावर कधी सोपवली गेली नाही. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर अजून काँग्रेस कार्यकर्त्यांना देता येत नाही. अशोक चव्हाण यांच्याकडून अपेक्षा खूप लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यातील आठ जागांमध्ये प्रभाव निर्माण करण्याची क्षमता अशोक चव्हाण यांच्यामध्ये आहे. मात्र, अशा बांधणीसाठी आवश्यक तो समन्वय, अधिकार यामुळे अपेक्षा खूप असतानाही अशोक चव्हाण यांच्याकडून फारसे काही घडत नसल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात.