Vijay Rupani Died in Air India Plane Crash एअर इंडियाच्या एआय १७१ या विमानाच्या अपघाताने देशभरात खळबळ उडाली आहे. या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे हे एआय १७१ विमान होते. अहमदाबादहून निघालेल्या या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली होती, मात्र आता एक प्रवासी बचावल्याचीही माहिती समोर येत आहे. प्रवाश्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश होता. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झाला आहे.
१२ जून २०२५ रोजी दुपारी १.३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मेघानी नगरमधील एका निवासी भागात कोसळले. उड्डाणानंतर सुमारे पाच मिनिटांनी हा अपघात झाला. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल होते, तर क्लाइव्ह कुंदर हे सह-वैमानिक होते. विमानात २३० प्रौढ नागरिक आणि दोन बालकांसह १२ क्रू सदस्यांचा समावेश होता. या अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील आपत्कालीन पथके ताबडतोब सक्रिय करण्यात आली. अहमदाबादमध्ये असलेले डायरेक्टर ऑफ एअरवर्थिनेस (DAW), असिस्टंट डायरेक्टर ऑफ एअरवर्थिनेस (ADAW) आणि एक फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर (FOI) यांनी घटनेची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. कोण होते विजय रुपाणी? जाणून घेऊयात.

विजय रुपाणी कोण होते?
- विजय रुपाणी यांनी १९८७ मध्ये राजकारणात पदार्पण केले होते, परंतु २०१४ साली त्यांना विधानसभेची जागा जिंकण्यात यश आले. रुपाणी भाजपातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) स्वतःसाठी एक मजबूत पाया रचला होता.
- जेव्हा आनंदीबेन यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली, तेव्हा त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले होते. ते ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
- विजय रुपाणी यांचा जन्म बर्मामधील यांगून येथे झाला होता आणि लहान वयातच ते त्यांच्या पालकांसह भारतात आले.
- शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख भाजपाची वैचारिक शाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस)शी झाली आणि ते संघात सामील झाले.
- मुख्य म्हणजे महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी राजकारणात सक्रियपणे भाग घेण्यास सुरुवात केली.
- १९८७ मध्ये ते भाजपाचे उमेदवार म्हणून राजकोट महानगरपालिकेत निवडून आले आणि अखेर १९९६ मध्ये महापौर झाले.
- त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते हळूहळू यशाचे टप्पे गाठत होते. १९९८ मध्ये ते भाजपा राज्य युनिटचे सरचिटणीस झाले आणि २००६ मध्ये त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाले.
- २००६ ते २०१२ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
२०१४ मध्ये राजकोट पश्चिम येथून विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली आणि त्यात त्यांना यश मिळाले. आनंदीबेन सरकारमध्ये त्यांनी परिवहन, कामगार आणि रोजगार यासह अनेक खाती सांभाळली. विशेष बाब म्हणजे त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीचे उमेदवार मानले जात नव्हते. त्यांची बढती दोन कारणांमुळे झाली असे मानले जाते. त्यांचे बोलणे मृदुभाषी होते आणि त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना घेऊन चालणारे होते. अमित शाह यांच्याशी त्यांची जवळीक होती. गुजरातला हादरवून टाकणाऱ्या पाटीदार आंदोलनानंतर आनंदीबेन यांना पद सोडावे लागेल हे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्यमंत्री नितीन पटेल यांना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य मानले गेले, परंतु भाजपाने विचारपूर्वक निर्णय घेत विजय रुपाणी यांचे नाव पुढे केले.
त्यावेळी गुजरातमध्ये पटेल आणि दलित दोन्हीही भाजपाविरोधात आंदोलन करत असल्याने, रुपाणी यांची निवड वादग्रस्त मानली जात होती. ७ ऑगस्ट २०१६ रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून रुपाणी यांनी भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेतली. ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात गृह विभागाने ५७ आयपीएस अधिकारी आणि चार राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची बदली केली. २०१७ साली भाजपाने पुन्हा गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आणि विजय रूपाणी यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले.
अहमदाबाद विमानतळावरील कामकाज स्थगित
एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. “एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या घटनेमुळे, अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPIA) सध्या कार्यरत नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत,” असे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.