सतीश कामत

राज्याच्या उद्योग खात्यात यापूर्वी काय काम झाले, हे मी शोधून काढणार आहे. वेदान्तचा प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी दिले पाहिजे. तसेच डाऊ संदर्भात त्यांची काय चर्चा झाली, हेही मी शोधणार आहे, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या ‘शिव संवाद यात्रे’मध्ये बोलताना, वेदान्त प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याबद्दल उद्योगमंत्र्यांना जबाबदार धरले. त्याबाबत प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीमुळेच तो प्रकल्प अन्य राज्यात गेला. युवा पिढीचे नुकसान मागील सरकारनेच केले. अशा विषयावर उच्च स्तरीय समितीची बैठक होत नाही, तोपर्यंत प्रकल्पाच्या प्रवर्तकांना काय सवलती न्याय त्या, हे ठरत नाही. गुजरातने मे महिन्यात पॅकेज दिले, तर त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच पॅकेज जाहीर केले होते; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

हेही वाचा : शिवसेनेसाठी दसरा मेळावा प्रतिष्ठेचा का ?

दुसरीकडे राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे यांना सामंतांनी चिमटा काढला. ते म्हणाले की, या दौऱ्यात आदित्य ठाकरे रिफायनरीविषयीचे धोरण जाहीर करतील. लोकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, हे राजकीय वक्तव्य आहे. महाराष्ट्रातील, कोकणातील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे. प्रकल्प झाला पाहिजे की नाही, यावर बोलले पाहिजे. बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे न्यायचे की नाही, शिंदे यांची भाजपाबरोबर झालेली युती योग्य की अयोग्य, यावर त्यांनी भाष्य केले पाहिजे. आमच्या मतदारसंघात येऊन टवाळकी करुन गद्दार असल्याची भाषणे करुन काही होणार नाही. लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांचीच ‘क्रेझ’ आहे. लोक स्वतःहून सांगत आहेत, की तुम्ही केलेले धाडस हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्याविरोधात कितीही भाषणे करावीत. लोक मतदानातून जागा दाखवतील.
जिल्ह्यातील कॉर्नर सभेला चारशे खुर्च्या आणि हजारभर माणसं होती. आदित्य ठाकरेंसारख्या नेत्याला आणून अशी कॉर्नर सभा घेेणे हा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे, अशा शब्दात सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या शिव संवाद यात्रा मेळाव्याची खिल्ली उडवली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नियोजित रत्नागिरी दौऱ्याच्या सभेत कोण, किती आणि कसे निष्ठावंत आहेत हे बोलेन, असा इशाराही त्यांनी दिला .

हेही वाचा : संवर्धनाचा इतिहास : सिंह, वाघ, चित्ता आणि राजकारण

राष्ट्रवादीतून बाहेर पडलो तरी नेत्यांवर टीका केली नाही. मी राजकीय नियम पाळतो. आताही मी उध्दव ठाकरेंवर कधीच बोललो नाही, असे नमूद करून सामंत म्हणाले की, विकासकामे करुन निवडणूक जिंकून माझी ताकद दाखवेन. शिवीगाळ करुन पक्ष वाढत नाही. माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनीच एके काळी आदित्य ठाकरेंच्या आवाजावर टीका केली होती. उध्दव ठाकरेंचा हात वर जात नाही, असे आरोप करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशा शब्दात सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली. तसेच अनंत गिते यांना, आपण पुन्हा खासदार होणार नाही, हे माहीत आहे. त्यामुळे ते आरोप करत फिरत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच गितेंनी उध्दव ठाकरेंना लक्ष्य केले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.