प्रदीप नणंदकर

लातूर : राज्यात भाजपची सत्ता आली आणि गटातटाचे खेळ अधिक गडद होऊ लागलेले असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच लातूर दौऱ्यात एकीचे बळ सांगून भाजपच्या स्थानिक नेत्यांची शाळा घेतली. स्वत:च्या मतदारसंघातील उदाहरण देत ते म्हणाले, की मतदारसंघात माझ्या समाजाचे केवळ अडीच हजार मतदार आहेत. मात्र १९९५ पासून सलग दरवेळी मी विधानसभेला निवडून येत आहे. तोही अधिक मताधिक्याने. लातूर जिल्ह्यात तर पक्षात मोठे नेते आहेत. त्यांनी आता एकीचे बळ दाखविण्याची गरज आहे. ते एक झाले तर विजय नक्कीच सुकर होईल.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला; तिरंगा, राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचेही फलक

राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. भाजप या सत्ताधारी युतीमध्ये मोठा आहे. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला संधी मिळाली नाही. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होईल असा सर्वांना विश्वास वाटत असताना प्रत्यक्षात उपेक्षा झाली. त्यातून आता लातूर जिल्हा भाजपमध्ये हळूहळू गटबाजी डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडी एकजुटीने लढण्यासाठी प्रयत्न करत असताना भाजपच्या नेत्यांमध्ये दुफळी राहिल्यास फटका बसू शकतो हा अंदाज आल्यानेच गिरीश महाजन यांनी एकजुटीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा…भारत यात्रेत राहुल गांधींबरोबर चालताना सर्फराज काझीला दिसले बेरोजगारीचे विक्राळ रूप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन दौऱ्यावर आले असता त्यांनी पक्षातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड व खासदार सुधाकर श्रुंगारे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर आदी नेत्यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी लातूर जिल्ह्यातील भाजपची स्थिती चांगली असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘लातूर जिल्ह्यात तर भाजपची ताकद मोठी आहे. तीन आमदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका सर्वांनी एकत्रितपणे लढवल्या तर विजय अवघड नाही.’ गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सारे आलबेल नसल्याची चर्चा सुरू होतीच. प्रत्येक नेता स्वत:चा गट बांधत असल्याने संघटनेचा डोलारा टिकवून ठेवणे गरजेचे बनले आहे. संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार अभिमन्यू पवार व आमदार रमेश कराड यांना गिरीश महाजन यांनी एकीच्या बळाचे धडे दिले खरे, पण ते अंमलात येणार का आणि येत्या महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे चित्र दिसणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.