गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदावर राहिलेल्या अर्जुन मोढवाडिया यांनी नुकतीच भाजपाची वाट धरली. ते गुजरातमधील काँग्रेसचे जुने जाणते मातब्बर राजकारणी मानले जात होते. मात्र, आता ते पोरबंदरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उभे राहिले आहेत. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यानंतरच ही जागा रिकामी झाली होती. मात्र, काँग्रेसमध्ये इतक्या महत्त्वाच्या पदावर असूनही त्यांनी पक्ष का सोडला तसेच त्यांना पक्षात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केलंय.

‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजपाचे घोषवाक्य विरोधकांनी जिंकलेल्या मतदारसंघांसाठी लागू होतं, असं तुम्हाला वाटतं का?

माझ्या अनुभवानुसार तरी नाही. एखादी समस्या घेऊन गेल्यानंतर सरकारमधील कुणी मला ‘नाही’ म्हटलंय असा अनुभव आलेला नाहीये. मग ती समस्या लहान असो वा मोठी! मात्र, एखाद्याला जर खरोखरच मोठा बदल घडवून आणायचा असेल तर हे अत्यंत सहाजिक आहे की, राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडील सरकार हे तुमच्या बाजूचं असायला हवं. आता बुलेट ट्रेन प्रकल्पाचंच उदाहरण घेऊ. जेव्हा नरेंद्रभाई दिल्लीला गेले, तेव्हा गुजरातमधील भाजपा सरकारला या प्रकल्पासाठी मोठी चालना मिळाली.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली याचं कारणही हेच होतं की, केंद्र सरकारकडून त्याला चांगला पाठिंबा मिळला. आम्ही या प्रकल्पाची खिल्ली उडवायचो. मात्र, आज ६० लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात. वाळवंटात करमणुकीसाठी कोण जाईल, असा सवाल करत मी स्वत: रण उत्सवाची खिल्ली उडवली होती. मात्र, कच्छमधील रण उत्सवाचे ठिकाण असलेल्या धोर्डो गावाला अलीकडेच जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जेव्हा अहमदाबादमधील साबरमती आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती, तेव्हा तो १६५ एकरपर्यंत पसरलेला होता. त्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती ते त्याची जमीन विकत राहिले आणि आज तो फक्त पाच एकरपर्यंतच मर्यादित राहिला आहे. अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमाचा परिसर विकसित करण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे.
दिल्लीत नसते तर कदाचित मोदींसाठीही हे झालं नसतं. सरकारी धोरणांमध्ये विरोधकांकडून बळजबरीने काही बदल घडवला जाऊ शकत नाही, हे सहाजिकच आहे. मात्र, याचा अर्थ तुमच्या मतदारसंघातील कामे अडवून ठेवली जातात, असं काही नसतं. मात्र, तुम्हाला खरोखरच धोरणांमध्ये काही बदल घडवायचे असतील तर तुम्हाला एकतर सत्ता हातात घ्यावी लागते किंवा सत्तेसोबत जावं लागतं.

हेही वाचा : NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास

काँग्रेसमध्ये असूनही ऑक्टोबर २०२३ मध्ये तुम्ही ‘व्हायब्रंट गुजरात’च्या कार्यक्रमात सहभागी झाला होता, त्याबद्दल काय सांगाल?

पोरबंदरच्या विकासासाठी मी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, तेव्हा भाजपामध्ये जायचं असा काही विचार माझ्या मनात नव्हता. सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि अहमद पटेल यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या पोकळीची अडचण होती. राज्य काँग्रेसमध्ये काही अडचण होती असं नव्हतं. मात्र, दिल्लीमध्ये अराजकीय लोकांकडून निर्णय घेतले जात होते, ज्यांनी कधी प्रत्यक्ष जमिनीवर कामच केलेलं नाहीये किंवा ज्यांनी लोकांच्या समस्याच समजून घेतलेल्या नाहीत; अशा लोकांचा पक्षावर ताबा निर्माण झाला आहे. कारण काय? तर ते परदेशातील एखाद्या संस्थेतून शिकून आले आहेत किंवा त्यांच्यामागे बड्या नेत्याचा हात आहे किंवा त्यांच्याकडे भाषण वा चांगलं लिखाण कौशल्य आहे म्हणून!

यामुळेच काँग्रेसने सध्या विधिमंडळातील विरोधी पक्षाचा दर्जाही गमावला आहे. एवढंच नव्हे तर आता राज्यातील पक्षाच्या अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज्यातील ही स्थिती बदलण्यासाठी गेली सात ते आठ वर्षे मी प्रयत्नशील होतो, मात्र काहीही घडू शकलं नाही. माझ्यासारखाच अनेकांनी पक्षाला रामराम केला. कार्यकर्ता आणि नेत्यांमधले नातेसंबंधदेखील तुटलेले आहेत.

पक्षासोबत शेवटचा वाद काय झाला होता?

एखादा राजकीय पक्ष चालवणं हे काही अर्धवेळ नोकरीसारखं काम नाही. केवळ सभेला उपस्थित राहून मोदींवर टीका करणं एवढंच तुमचं काम असू शकत नाही, तुम्हाला लोकांना आकर्षित करावं लागेल आणि त्यांच्यासोबत स्वत:ला जोडून घ्यावं लागेल. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याबाबतची काँग्रेसची भूमिका हे याचं एक उदाहरण आहे.

लोकांच्या भावना काय आहेत, तेच तुम्ही समजून घेत नाही. इथं तर अशी परिस्थिती आहे की, तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांसोबत, तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांसोबत संपर्कात राहत नाही. कोण शक्तिशाली आहे आणि कोण नाही, हेच ते ओळखू शकत नाहीत. घोडा कोण आणि गाढव कोण हेही त्यांना ओळखता येत नाही. तर अशा काही घटनांची जंत्रीच आहे, ज्यामध्ये मला आता खोलात शिरायचं नाही.

मला असं वाटलं की, राज्यातील काँग्रेसची ही परिस्थिती काही मी बदलू शकणार नाही. अशा पार्श्वभूमीवर इतकी वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहूनही आणि त्यांच्याविरोधात लढूनही जेव्हा नरेंद्रभाई आणि अमितभाईंसारखा नेता तुम्हाला मनापासून त्यांच्या पक्षात बोलावतो, तेव्हा सहाजिकच अशा गुदमरवून टाकणाऱ्या वातावरणात काम करण्यापेक्षा तिथेच जाणं कुणीही पसंत करेल.

२०२२ च्या निवडणुकीच्या साधारण एक वर्षे आधी मी काँग्रेसच्या नेतृत्वाला इशारा दिला होता की, गुजरातमध्ये आपण अस्तित्वाचीच लढाई लढत आहोत. सध्या अशी धारणा निर्माण झाली आहे की, काँग्रेस कुठेच अस्तित्वात नाहीये आणि ही धारणा लवकरात लवकर बदलणं गरजेचं आहे. मात्र, दिल्लीतल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या एका सहाय्यकानं मला सांगितलं की, निवडणूक लढण्यापूर्वी मीच पराभव स्वीकारतो आहे.

हेही वाचा : नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक विरोधकांवर असलेले खटले मागे घेण्यात आले आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता?

खटले मागे घेण्याचं काम न्यायालयाकडून होतं, सरकारकडून नाही. दुसरं असं की, लोक असे आरोप करत आहेत की, ईडी, सीबीआय, आयकर विभाग इत्यादींचा वापर शस्त्र म्हणून केला जातो आहे. संपूर्ण गुजरातला आणि भारताला हे माहिती आहे की, मी विरोधकांमध्ये असताना किती आक्रमक नेता होतो. मात्र, मला कधीही ईडीने त्रास दिलेला नाही. मी कधीही सीबीआय वा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे चेहरेही पाहिलेले नाहीत. आग लागल्याशिवाय धूरसुद्धा निघत नाही. जर तुम्ही मद्यधोरणात घोटाळा करून पैसे घेतले असतील, तर तुरुंगात जायची तयारी तुम्हाला करावीच लागेल.

पोटनिवडणूक लढवताना तुमच्या मतांमध्ये झालेला हा बदल तुम्ही लोकांना कसा समजावून सांगाल?

खरं तर मला माझ्या लोकांकडूनच असा दबाव होता की, माझी ऊर्जा काँग्रेसमध्ये पूर्णत: वापरली जात नाही आणि त्यांच्याकडूनच असं सतत सांगितलं जात होतं की, ती ऊर्जा अधिक चांगल्या पद्धतीने भाजपामध्ये वापरली जाऊ शकते. इथे भाजपा खूप शक्तिशाली आहे, कारण तीच तालुका पंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि पोरबंदर लोकसभेवरही आहे. इथे काँग्रेसला जो पाठिंबा मिळत होता, तो केवळ माझ्या असण्यामुळे… उलट मी जर हा निर्णय घेतला नसता तर कदाचित लोकच अधिक नाराज झाले असते.

तुम्ही काँग्रेसचा एक भाग म्हणून निवडणूक लढवली होती, तेव्हा आणि आता तुम्हाला काही फरक दिसतोय का?

काँग्रेसमध्ये उमेदवाराला खूप तयारी करावी लागते. मात्र, भाजपामध्ये उमेदवारापेक्षा कार्यकर्तेच अधिक तयारीत असतात, हाच एक मूलभूत फरक आहे. तसेच पन्नाप्रमुख ते अखिल भारतीय अध्यक्षापर्यंत सगळी यंत्रणा अगदी नीट पद्धतीने बांधली गेली आहे. तसेच जबाबदाऱ्याही योग्य पद्धतीने वाटून दिलेल्या आहेत आणि या सगळ्यावर लक्ष ठेवणाराही एक गट कार्यरत आहे.

भाजपाकडून तुम्हालाच तिकीट मिळेल, याबाबत तुम्हाला आधीपासूनच आत्मविश्वास होता का?

भाजपा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची कामं देते. त्यामुळे ते मला काहीतरी काम नेमून देतील अशी मला अपेक्षा होतीच. म्हणजे मी नसतो तर भाजपा हे करू शकली नसती असं नाही. गुजरातमध्ये भाजपाने आधीच २६ जागा जिंकल्या आहेत आणि यंदाही याचीच पुनरावृत्ती होणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी १५६ जागा भाजपाने जिंकल्या आहेत आणि आता येत्या निवडणुकीत तर त्यात आणखी चार-पाच जागांची भरच पडेल.

हेही वाचा : काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?

बाबरी मस्जिद पाडणे त्याचप्रमाणे २००२ च्या गुजरात दंगलींमधील हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप भाजपा नेत्यांवर आहे. याविषयी तुमचं काय मत आहे?

जे दंगलीत सहभागी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. अगदी भाजपा सरकार असतानाही हे घडलं आहे. कुणीही कोणाला कायदा हातात घ्यायला सांगत नाही. वास्तव असं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. मोदी दहा वर्षांपूर्वीच पंतप्रधानपदी आले असले तरी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी वाट पाहिली. त्याआधी ते तिथे दर्शन घ्यायलाही गेले नाहीत. देशात कोणताही पक्ष धार्मिक दंगलींमध्ये सहभागीही होत नाही आणि तिला पाठिंबाही देत नाही.

विचारधारा, निष्ठा, सत्ता या तीन गोष्टी तुम्ही कोणत्या क्रमाने लावाल?

या तीनही गोष्टी एकमेकांसोबतच चालतात. मात्र मला सांगा, विचारधारा म्हणजे काय? आपण सगळ्यांनी लोकांचं जगणं अधिक सुसह्य आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने करतो. उदाहरणार्थ, मी महात्मा गांधी यांचा आदर करतो. पण, गांधीवादी विचारांच्या आड लपलेल्या ढोंगी लोकांनी साबरमती आश्रमाचा विकास का केला नाही?

तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते भाजपामध्ये गेल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांना यातून काय संदेश जातो?
कोणता संदेश जात असेलच तर तो एकच आहे, तो म्हणजे आत्मपरीक्षण!