Imran Pratapgarhi:महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेले उत्तर प्रदेशचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या पक्षात झपाट्याने झालेल्या उदयाने काँग्रेसमधील अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. राज्यसभेचे खासदार असण्याव्यतिरिक्त, प्रतापगढी सध्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेले ३७ वर्षांचे इम्रान प्रतापगढी हे एक कवीही आहेत.
दरम्यान, प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुजरात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. यामुळे गेल्या सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरबद्दल गुजरात पोलिसांवर ताशेरे ओढले. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, “संविधान अस्तित्वात आल्यानंतर ७५ वर्षांनंतर तरी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असते हे किमान पोलिसांना तरी समजले पाहिजे.”
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, इम्रान प्रतापगढी काही दिवसांपूर्वी गुजरातच्या जामनगर येथे एका लग्न समारंभात सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी “ए खून के प्यासे बात सुनो” ही कविता पार्श्वभूमीत वाजवणारा एक व्हिडिओ अपलोड केला होता. यानंतर कवितेतील शब्द आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीवर कारवाई करताना, गुजरात पोलिसांनी ३ जानेवारी रोजी प्रतापगढी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
कोण आहेत इम्रान प्रतापगढी?
उत्तर प्रदेशातील प्रतापगढमधील शमशेरगंज बाजार गावात जन्मलेले प्रतापगढी हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील मोहम्मद इलियास खान युनानी डॉक्टर आणि आई साजिदा खान गृहिणी आहेत.
इम्रान यांनी प्रतापगढमधील एका शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून २००८ मध्ये हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी विद्यापीठातून पत्रकारितेचा डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. महाविद्यालयीन काळापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि हिंदी कवी संमेलनांमध्ये त्या सादर करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उर्दू मुशायरांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि लवकरच याद्वारे लोकप्रियाता मिळवली, त्यांचा चाहता वर्ग आता देशभरात आणि परदेशातही पसरलेला आहे.
प्रतापगढी यांच्या कवितांध्ये सामाजिक आणि राजकीय विषयांचाही समावेश आहे, ज्यामध्ये उपेक्षित आणि असुरक्षित घटकांच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला आहे.
राजकारणात येण्यापूर्वी, प्रतापगढी यांच्या कवितेचा एक प्रमुख विषय लिंचिंग होता. देशाच्या विविध भागांमध्ये लिंचिंगच्या विविध घटनांमध्ये ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले त्यांना त्यांनी मदत केल्याचेही म्हटले जाते. २०१७ मध्ये, त्यांनी दिल्लीच्या जंतरमंतर येथे लिंचिंगच्या विरोधात प्रतीकात्मक निषेध म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ज्याला “लहू बोल रहा है” असे नाव दिले होते.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात
इम्रान प्रतापगढी यांच्या कविता आणि सामाजिक कार्याने प्रभावित होऊन, काँग्रेसने त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी बोलावले होते. प्रतापगढी यांना राहुल गांधींना भेटण्यासाठी २० मिनिटे देण्यात आली होती, परंतु ही बैठक जवळजवळ दोन तास चालली, जिथे त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली.
काही महिन्यांनंतरच, काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रतापगढी यांना मुरादाबाद मतदारसंघातून तिकीट दिले, जिथे ते ४.६२% मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. तर, सपाचे एस.टी. हसन यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करून ही जागा जिंकली.
यानंतर, पुढे जून २०२१ मध्ये काँग्रेसने प्रतापगढी यांना पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. जुलै २०२२ मध्ये, ते महाराष्ट्रातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून आले आणि वरिष्ठ सभागृहातील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक बनले.
संसदेतील त्यांची भाषणे पद्यांनी भरलेली असतात. ते काँग्रेस वर्तुळातही लोकप्रिय आहेत. “जेव्हा इम्रान प्रतापगढी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात येतात आणि त्यांच्या कार्यालयात बसतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहणारे अनेक लोक असतात. हे लोक देशभरातून दूरदूरच्या ठिकाणांहून येतात. आणि हे चित्र बहुतेकदा काही वरिष्ठ नेत्यांच्या कार्यालयाबाहेरील गर्दीपेक्षा मोठे असते,” असे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
मी आज जो काही आहे तो…
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रतापगढी म्हणाले की, “मी आज जो काही आहे तो सोशल मीडिया, मुशायरे आणि कवी संमेलनांमुळे आहे. माझ्या कविता खूप सोप्या असतात. तुम्ही असे म्हणू शकत नाही की त्या कठीण हिंदी किंवा उर्दूमध्ये असतात. त्या सर्वांसाठी आहेत.”
प्रतापगढी पुढे म्हणाले की, “मी माझ्या शालेय जीवनात कविता कार्यक्रमांना उपस्थित राहायचो. एकदा मी अलाहाबाद विद्यापीठात गेलो तेव्हा ते एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. जिथे इच्छुक कवींना सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वातावरण मिळते.”
प्रतापगढी यांना २०१६ मध्ये तत्कालीन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपा सरकारने त्यांच्या कविता आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी “यश भारती” पुरस्कार प्रदान केला होता. २९ व्या वर्षी, ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती होते.
“मी सक्रिय राजकारणात नसतानाही, सामाजिक विषयांवरील कविता आणि लिंचिंग पीडित कुटुंबांना मदत करून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करत होतो,” असेही प्रतापगढी यांनी स्पष्ट केले.