पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रमुख संस्था हाती ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आपल्या गटात घेऊन त्यांच्याच हाती संस्थेचा कारभार सोपविण्याचा नवीन ‘राजकीय पॅटर्न’ सुरू केला असताना, बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रिंगणात उतरली आहे. हे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च उमेदवारी अर्ज दाखल करून नवा डाव टाकला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत ‘काका विरुद्ध पुतण्या’ सामना रंगणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सत्ताकेंद्र असलेली ठिकाणे ताब्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी विरोधकांनाच आपल्या पॅनेलमध्ये घेऊन त्यांच्या हाती सत्ता सोपविण्याचा नवीन पॅटर्न केला. त्यांनी पृथ्वीराज जाचक यांना पॅनेलचे प्रमुख करून विजय मिळविला. त्यामुळे अजित पवार यांच्या या नवीन पॅटर्नची चर्चा आहे.

श्री छत्रपती कारखान्यानंतर बारामतीतील माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हा कारखाना बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र आहे. या कारखान्यावर पवार कुटुंबाचे कायम वर्चस्व राहिले आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष तटस्थ राहिला होता. त्यांनी निवडणुकीत भाग घेतला नव्हता. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला आहे. अर्ज माघारीसाठी अद्याप मुदत आहे. पवार हे अर्ज कायम ठेवणार का, याबाबत उत्सुकता आहे. त्यांनी अर्ज मागे घेतला, तरी त्यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे, हे स्पष्ट झाले आहे.

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी अनुभव पणाला लावून विजय मिळविला होता. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने काका-पुतण्याची दुसऱ्यांदा लढत होणार आहे.

चंद्रराव तावरेंची भूमिका निर्णायक

माळेगाव कारखान्यामध्ये पवार आणि तावरे कुटुंबातील राजकीय संघर्ष हा अनेक वर्षांपासून आहे. पवार कुटुंबाचा या कारखान्यावर प्रभाव राहिला आहे. तावरे हे भाजपच्या गोटात असून, लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून अजित पवार यांच्याबरोबर समेट घडवून आणला होता. त्यामुळे तावरे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. मात्र, माळेगाव कारखान्यावरून पुन्हा तावरे आणि अजित पवार यांच्यात संघर्ष पेटला आहे. चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी पॅनेल उभे केले आहे.

या कारखान्याच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तावरे यांच्या पनेलने अजित पवार यांच्या पॅनेलला धक्का देत कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. मात्र, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवारांनी सत्ता खेचून आणली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘नीळकंठेश्वर पॅनेल’ ने विजय मिळवला होता. आता तावरे यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचेही पॅनेल असणार आहे. तसेच शेतकरी पॅनेलही आहे. त्यामुळे अजित पवार हे कोणती खेळी खेळणार, याबाबत कारखान्याच्या सभासदांमध्ये उत्सुकता आहे. त्यामध्ये चंद्रराव तावरे यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीतही ते विरेाधकांना आपलेसे करून त्यांच्या हाती सत्ता देण्याचा ‘राजकीय पॅटर्न’ अवलंबणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.