अलिबाग: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात नवनवीन राजकीय समिकरणे तयार झाली आहेत. युत्या आणि आघाड्यांच्या या राजकारणात कार्यकर्त्यांची मात्र फरफट सुरू असल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे. काल पर्यत एकमेकांविरोधात लढणारे नेत्यांचे एकमेकांसोबत आले असले तरी कार्यकर्त्यांचे समजूत काढतांना नेत्यांची कस लागत आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे लढले होते. आता ते महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. ज्या तटकरेंविरोधात गेल्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेनी प्रचार केला. त्याच तटकरेंचा प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

दुसरीकडे अनंत गीते गेल्या निवडणूकीत हे शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते. आता ते इंडीया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेकापचा त्यांना पाठींबा असणार आहेत. ज्या गीतेंविरोधात शेकाप, काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या निवडणूकीत प्रचार केला होता त्यांना यावेळी गीतेंचा प्राचर करावा लागणार आहे. युत्या आणि आघाड्यांच्या राजाकारणा जिल्ह्यातील राजकीय समिकरणे, ही ३६० अंशाच्या कोनात अशीकाही फिरली आहेत. की कार्यकर्तेही चक्रावले आहेत.

नेत्यांनी नव्या राजकीय समिकरणांशी जुळवून घेतले असले तरी कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. हा नवीन बदल पचवणे आणि तो आमलात आणणे कार्यकर्त्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत काढतांना नेत्यांचाही कस लागतो आहे. याचाच प्रत्यय अलिबाग येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने आला.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. गावपातळी वरच्या राजकारणात युतीतील घटक पक्षांत प्रचंड धुसफूस पाहायला मिळाली होती. बऱ्याच ठिकाणी महायुतीच्या मत विभाजनाचा फायदा विरोधकांना झाला होता. त्यामुळे संधी असूनही काही ग्रामपंचायती गमावण्याची वेळी महायुतीतील घटक पक्षांवर आली होती. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता याच कार्यकर्त्यांना एकत्र येणास सांगितले जात आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची मोठीच कुचंबणा झाली आहे.

हेही वाचा : उदयनराजेंना उमेदवारीची प्रतीक्षाच

लोकसभा आणि विधानसभेसाठी जर युती होऊ शकते तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही सामोपचाराची भूमिका का दाखवली गेली नाही असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. या कार्यकर्त्यांची समजूत काढणे नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे दिसून येते आहे.