नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानयंत्रांमध्ये झालेले कथित फेरफार, मतदानाच्या टक्केवारीतील अविश्वनीय वाढ आणि निकालातील अनियमितता अशा वादग्रस्त मुद्द्यांचा आधार घेत ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने दोन-चार दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’ आघाडीने पहिल्यांदाच मतदानयंत्रांच्या वापराविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी रात्री काँग्रेसचे खासदार व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी, ‘आप’चे समन्वयक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदानयंत्रे, मतांची टक्केवारी व निकाल यांतील कथित अनियमितता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पराभूत उमेदवारांच्या अनुभवांची नोंद सिंघवींनी घेतली. या आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघांतील मतदान प्रक्रियेतील गोंधळाची माहिती गोळा केला जाणार आहे. त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिली. सिंघवी यांच्या बैठकीपूर्वी शरद पवार यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांशी चर्चा केली होती.

हेही वाचा : विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

मारकडवाडीचा वणवा इतरत्रही?

‘सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीमध्ये मतपेटीद्वारे मतदान घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मतदानाची प्रक्रिया पोलिसांनी बंद पाडली असली तरी, मतदानयंत्रांच्या वापराविरोधात गावा-गावांत वातावरण निर्माण होऊ लागले आहे. किमान १४-१५ गावांतील ग्रामस्थांनी मारकडवाडीचा प्रयोग आपापल्या गावात करण्याची तयारी दाखवली आहे’, असा दावा महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्याने केला.

मतदान आकडेवारीची मागणी

● काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही याच मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतली. महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदानयंत्रांमध्ये फेरफार झाला असू शकतो, अशी शंका व्यक्त केली होती.

हेही वाचा : शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये मतांचा वाढीव टक्का व निकालातील अनियमता यावर सविस्तर युक्तिवाद केला होता व आयोगाकडून मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारीही मागितली होती.