Laxman Singh Expelled from Congress : काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले मध्य प्रदेशातील माजी आमदार लक्ष्मण सिंह यांची अखेर काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर विशेषतः राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने लक्ष्मण सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीला वेळेत उत्तर न दिल्याने पक्षाने बुधवारी (तारीख १२ जून) त्यांचं निलंबन केलं आहे. लक्ष्मण सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू आहेत.

“लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सातत्याने लक्ष्य करून लक्ष्मण सिंह यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांच्या या पक्षविरोधी कृतीमुळे त्यांना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू होत आहे,” अशी माहिती काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे सदस्य तारिक अन्वर यांनी बुधवारी दिली.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन केला होता भाजपात प्रवेश

मध्य प्रदेशातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंग काँग्रेसमध्ये कधीच रुळू शकले नाहीत. पक्षातील नेत्यांबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी काही काळ भाजपाचं कमळ हाती घेतलं होतं. मात्र, तिथेही त्यांची कोंडी होत असल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लक्ष्मण सिंह यांना पुन्हा पक्षात घेऊनही अलीकडील काळात त्यांची टीकात्मक भूमिका काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत होती, असं पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितलं.

आणखी वाचा : ED Raids : काँग्रेसच्या एका खासदारासह तीन आमदार ईडीच्या रडारवर; प्रकरण नेमकं काय?

लक्ष्मण सिंह यांची काँग्रेसमधून हकालपट्टी का झाली?

  • ७० वर्षीय लक्ष्मण सिंह यांचा २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
  • विधानसभेतील पराभवानंतर ते काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांना सातत्याने लक्ष्य करीत होते.
  • काँग्रेसचे धोरण आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरील पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली होती.
  • अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने टाकलेल्या बहिस्कारावरही माजी आमदार लक्ष्मण सिंह यांनी नाराजी.
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनालाही पाठिंबा देण्यास लक्ष्मण सिंह यांनी नकार दिला होता.
  • लक्ष्मण सिंह हे सातत्याने पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचं लक्षात येताच काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
Congress leader Digvijay Singh brother Laxman Singh (Facebook)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह (छायाचित्र फेसबुक)

काँग्रेसच्या नेतृत्वावर उभं केलं होतं प्रश्नचिन्ह

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी पहगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर लक्ष्मण सिंह यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “राहुल गांधी आणि रॉबर्ट वढेरा हे दोघेही अपरिपक्व आहेत. त्यांच्या अपरिपक्वतेचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत… काँग्रेसला किती काळ यांच्यामुळे त्रास सहन करावा लागणार?,” असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला होता.

काँग्रेसच्या ‘त्या’ भूमिकेवर केली होती टीका

राहुल गांधी यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी आधी विचार करावा, ते विरोधीपक्षनेते आहेत, असंही लक्ष्मण सिंह म्हणाले होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर लक्ष्मण सिंह म्हणाले होते की, “आमंत्रण आलं असेल तर नकार देण्याचा अर्थ काय? आपण कोणता संदेश देत आहोत? जेव्हा राजीव गांधींनी बाबरी मशिदीचे कुलूप उघडले, तेव्हा तुम्ही कोण आहात नकार देणारे? जर आपल्या नेत्यांकडे असे सल्लागार असतील, तर निकाल तेच येतील जे आजवर आले आहेत.”

राहुल गांधींवर यांना केलं होतं लक्ष्य

डिसेंबर २०२३ मध्ये पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण सिंग म्हणाले होते, “राहुल गांधी हे फक्त एक कार्यकर्ते आहेत. ते केवळ खासदार असून त्यापलीकडे काहीही नाही. तुम्ही लोकांनीही त्यांना इतकं महत्त्व देऊ नये. कोणीही जन्माने महान होत नाही. कार्यांनी महानता सिद्ध करावी लागते. मी राहुल गांधींना महान नेता मानत नाही.” नागरिकत्व सुधारणा कायद्यावर (CAA) काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतली असताना लक्ष्मण सिंग यांनी मात्र कायद्याचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा : Karnataka Caste Survey : काँग्रेसने कर्नाटकमध्ये पुन्हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय का घेतला?

“सर्व पक्षांनी आपापली मते मांडली आहेत. यावर अजून विधाने करणे निरर्थक आहे. स्वीकारून पुढे जाऊ या,” असं त्यांनी म्हटलं होतं. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर असताना (२०१९–२०२३) शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्याबद्दलही त्यांनी पक्षावर टीका केली होती. “राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि कर्जमाफी नेमकी कधी होईल, हे स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मण सिंह यांची राजकीय कारकीर्द

लक्ष्मण सिंग यांचा राजकीय प्रवास १९८७ पासून सुरू झाला आणि राघोगडज पालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळविले. ते पाच वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २००४ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र, २००९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. जुलै २०१० मध्ये भाजपाने लक्ष्मण सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. २०१३ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. काँग्रेसने लक्ष्मण सिंग यांच्यावर कारवाई करून यापुढे कुठलीही पक्षविरोधी कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पक्षातील नेत्यांना दिला आहे. लक्ष्मण सिंह यांच्या निलंबनामुळे काँग्रेसमधील इतर असंतुष्ट नेत्यांनाही इशारा मिळाला आहे.