रत्नागिरी: शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात महायुतीच्या उमेदवार निवडीवर अवलंबून राहणार आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून एक मतदारसंघ तयार झाला. त्यानंतरची ही चौथी निवडणूक आहे.

यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश राणे यांनी काँग्रेसकडून रिंगणात उतरत शिवसेनेचे मावळते खासदार सुरेश प्रभू यांचा सुमारे पन्नास हजार मतांनी पराभव केला. पण हे यश तात्पुरते ठरले आणि त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी नीलेश यांचा दणदणीत पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत नीलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे उभे राहिले होते. तरीही त्यांनी सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती, हेही उल्लेखनीय. त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण व कणकवली वगळता, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या चार मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. त्यामुळे, २००५ मध्ये राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पडझडीतून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना पूर्णपणे सावरुन या दोन जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा स्थिरावली.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – ”लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन,” अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ”भाजप निवडणुकीपूर्वी…”

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकत्र येऊन काढून घेतला. ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत राज्यात या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. पण त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे हे सरकार कोसळले. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार मंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री दीपक केसरकर हेही या बंडात सहभागी झाल्यामुळे कोकणात पुन्हा एकदा पक्ष संघटनेला मोठा हादरा बसला आहे. त्याचा प्रभाव या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे जाणवणार आहे. यंदा विजयाची हॅटट्रिक साधण्याची मनिषा बाळगून असलेले खासदार विनायक राऊत या राजकीय वावटळीत ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या रुपाने ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. पण महायुतीच्या गोटामध्ये मात्र दबावाच्या राजकारणामुळे उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे.

किरण सामंत यांच्या नावाची चर्चा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका निभावत असलेले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण उर्फ भय्या सामंत यांचे नाव स्वतः पालकमंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पुढे रेटले आहे. सुरुवातीला काहीसे अनिश्चित वाटणारे किरण यांनीही गेल्या महिनाभरापासून उघडपणे भूमिका घेत पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे खरे तर महायुतीच्या बाजूनेही येथे उमेदवार निवडीचं काम सोपं झालं होतं. पण या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे आणि त्यासाठी अन्य प्रादेशिक पक्ष किंवा स्थानिक गटांना कमीत कमी जागा देऊन कमळाच्या चिन्हावर सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची रणनीती पक्षश्रेष्ठींनी आखली आहे. हा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. पण इथे भाजपाची स्वतःची ताकद खूपच मर्यादित असली तरी उमेदवार आपलाच असला पाहिजे, हे धोरण ठेवून त्यांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघातून सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव भाजपकडून पुढे केले जात आहे. चव्हाण यांची कर्मभूमी ठाणे-कल्याण-डोंबिवली आहे. पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ नारायण राणे यांच्यामुळे भाजपाचा प्रभाव काही प्रमाणात जाणवतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर तोही नाही. भाजपाच्या चाणक्यांना या परिस्थितीची नक्कीच कल्पना आहे. पण चव्हाणांचे नाव पुढे करत किरण सामंत यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, असा दबाव टाकला जात आहे. सामंत बंधू मात्र याबाबतीत फारसे उत्सुक नाहीत. किंबहुना, ‘मी शिवसेनेच्या धनुष्य-बाण या चिन्हावरच निवडणूक लढवू इच्छितो. अन्य कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्याची माझी तयारी नाही’, असे किरण यांनी लोकसत्ताशी बोलताना नमूद केले.

हेही वाचा – अडवाणी ते स्वामिनाथन! ५ दिग्गजांना सर्वोच्च सन्मान; ‘भारतरत्न’ देण्यामागे भाजपाचे ४ मुद्दे; नेमकं राजकारण काय? वाचा…

महायुतीचे बळ

किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली तर सामंत बंधूंचे रत्नागिरी जिल्ह्यात असलेले वर्चस्व, अजित पवार गटाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम यांचा पाठिंबा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री राहिले असल्यामुळे उदय सामंत यांनी निर्माण केलेल्या जाळ्यामुळे त्यांना जास्त अनुकूल वातावरण आहे. या दोन जिल्ह्यांमधील मुस्लिम मतदारांमध्येही त्यांचा प्रभाव पूर्वीपासून आहे. शिवाय राणे आणि केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन महत्त्वाचे नेते भाजपाच्या चव्हाणांपेक्षा सामंतांना पसंत करतील, असे वातावरण आहे. कारण चव्हाण निवडून आले तर जिल्ह्यातील आपली मक्तेदारी संपून येथील सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात जाऊन आपल्या नेतृत्वाला खीळ बसेल, अशी सुप्त भीती या नेत्यांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर किरण सामंत किती ठाम राहतात आणि त्यांनी तसा आग्रह कायम ठेवला तर भाजपा ही जागा शिंदे गटासाठी सोडतो, की रवींद्र चव्हाण किंवा अन्य कोणता पर्याय उभा करतो, यावर या मतदारसंघातील लढत अवलंबून राहणार आहे. पण मतदारसंघातील भाजपा आणि शिंदे गटाचे बलाबल लक्षात घेतलं तर सामंत बंधूंना दुखावून पुढे जाणं नुकसानकारक होऊ शकते, एवढे निश्चित!

२०१९ ची निवडणूक

विनायक राऊत (शिवसेना) – ४ लाख ५८ हजार ०२२

नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) – २ लाख ७९ हजार ७००

चंद्रकांत बांदिवडेकर (काँग्रेस) – ६३ हजार २९९

विधानसभा मतदारसंघ – चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी.