Loksabha Election Bharuch लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप काँग्रेस आणि आप यांच्यात औपचारिक जागावाटप झालेले नाही. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैझल पटेल यांनी शुक्रवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे आभार मानत ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आणि सहकार्य केल्याबद्दल या पोस्टद्वारे राहुल गांधी यांचे आभार मानले.

फैझल यांनी शुक्रवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, राहुल गांधींना मी पत्र लिहिल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय रोखून धरला आहे. कोणताही निर्णय येण्याच्या आधीच आपने भरुच मतदारसंघातून डेडियापाडाचे आमदार चैतर वसावा यांची उमेदवारी जाहीर केली. “अद्याप चर्चा सुरू आहे. जागावाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाही,” असे फैझल यांनी ‘एक्स’वर लिहिले. ते म्हणाले, “मी राहुल गांधींचे आभार मानतो. तुम्ही माझे आणि भरुच काँग्रेस कार्यकर्त्यांचे ऐकले. आम्हाला पाठिंबा दिल्याने माझा आणि माझ्या सहकार्‍यांचा सन्मान झाला आहे. मी तुम्हाला वचन देतो की, मी भरुच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून तुमच्या विश्वासावर खरा उतरेन.”

फैझल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, “मी पक्षाच्या वरिष्ठांशी बोललो आहे. भरुच लोकसभा मतदारसंघाची माहितीही दिली आहे. वरिष्ठांना मी सांगितले आहे की, या मतदारसंघातून आपपेक्षा काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. मला माझ्या सूत्रांद्वारे कळले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भरुच आणि भावनगर या मतदारसंघांच्या जागावाटपाचा निर्णय रोखून धरला आहे.”

आप उमेदवाराकडून निवडणुकीची तयारी

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स पाठविले आहे. संचालनालयाने त्यांना २६ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपर्यंत तरी जागावाटप होण्याची शक्यता नाही. फैझल यांच्यासह त्यांची बहीण मुमताज सिद्दीकी याही भरुचमधून काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे आप उमेदवार चैतर वसावा यांनी भरुच जिल्ह्यात २१ दिवसांच्या निवडणूक मोहिमेला सुरुवात केली आहे. गुरुवारी झगडिया येथून त्यांनी स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली. “चैतर वसावा यांची पकड त्यांच्या विधानसभेच्या जागेपुरतीच मर्यादित आहे. भरुच जिल्ह्यात विधानसभेच्या इतर सहा जागा आहेत. त्या जागांवर त्यांचा फारसा प्रभाव नाही. मी भरुचमध्ये खूप दिवसांपासून काम करीत आहे. ही जागा पूर्वी माझ्या वडिलांकडे होती. भरुच आमचे मूळ गावही आहे,” असे फैझल पटेल यांनी सांगितले.

फैझल पटेल यांचे राहुल गांधींना पत्र

राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात फैझल म्हणतात, “लोकसभेची भरुच ही जागा आमच्या कुटुंबासाठी आणि भरुच काँग्रेससाठी आत्मियतेचा विषय आहे. ही जागा माझे दिवंगत वडील अहमद पटेल यांची होती. भरुचचे लोक माझ्या वडिलांचा वारसा ओळखतात आणि जपतात. हीच भावना आम्हाला विजयाच्या दिशेने नेईल आणि भरुचमध्ये पक्षाचा सन्मान व प्रतिष्ठा वाढवेल.”

भरुच मतदारसंघात ३६ टक्के अनुसूचित जमाती, २५ टक्के अल्पसंख्याक व चार टक्के अनुसूचित जातींचा समावेश असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. “२०२२च्या गुजरातमधल्या निवडणुकीत भरुच लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी आपने केवळ डेडियापाडा ही जागा जिंकली होती. त्यांना इतर सहा जागा जिंकता आल्या नाहीत,” असेही त्यांनी या पत्रात लिहिले. “भरुचची जागा आपकडे सोपविणे योग्य ठरणार नाही. या जागेवरही दिल्ली आणि पंजाबसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे भरुचच्या लोकसभा जागेबाबत पुनर्विचार करावा, ही विनंती. आपला गड आणि पक्षाचे हित जपणे याला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे,” असेही फैझल यांनी लिहिले आहे.

पक्षश्रेष्ठींचा निर्णय हाच अंतिम

अहमद पटेल हे १९७७ ते १९८४ पर्यंत सलग तीन वेळा भरुच मतदारसंघातून निवडून आले होते. १९८९ ते १९९८ पर्यंत भाजपाचे चंदू देशमुख या जागेवर निवडून आले होते. त्यानंतर सलग सहा वेळा भाजपाचे मनसुख वसावा यांनी ही जागा जिंकली. काँग्रेसच्या एका नेत्याने फैझलच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. केजरीवाल यांच्या पुढील भूमिकेवर पक्षाचे लक्ष आहे.” “काँग्रेसने आपसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केली आहे; पण औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. २७ फेब्रुवारीला अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण- २६ फेब्रुवारीच्या ईडी समन्सवर केजरीवाल यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणंही महत्त्वाचं असेल” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : शरद पवार गट तुतारी फुंकून निवडणुकीच्या रणांगणात; ‘या’ चिन्हाचे नेमके महत्त्व काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, राज्याचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)च्या निर्णयाचे पालन करतील. गोहिल म्हणाले, “प्रत्येक कुटुंबात कुटुंबातील सर्व सदस्यांना विषयांवर आपले मत देण्यास सांगितले जाते; परंतु अंतिम निर्णय कुटुंबप्रमुखच घेतात. आम्हीदेखील आमचे मत पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे; परंतु अखेरचा निर्णय त्यांचाच असेल. हा निर्णय आमच्या मतानुसार असेल, तर आम्हाला आनंदच होईल; पण तसे नसले तरी आम्ही या निर्णयाचे पालन करू,” असे गोहिल यांनी सांगितले.