भोकर

नांदेड : हैदराबाद राज्याचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, राज्याचे माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, बाबासाहेब गोरठेकर अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात यंदा प्रमुख उमेदवारांमध्ये कोणीही आजी-माजी आमदार अथवा नेता नाही. नव्या पिढीचे प्रतिनिधी निवडणूक रिंगणात उतरले असले, तरी भाजपाचे नवे नेते खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा तेथे पणाला लागली आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द अशोक चव्हाण यांना आपल्या ‘होम ग्राऊंडवर’ मतदारांच्या रोषास तोंड द्यावे लागले होते. पक्ष बदलण्याच्या त्यांच्या या निर्णयावर मतदारांनी नापसंती दर्शवत काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भरभरून मते टाकल्यामुळे अशोक चव्हाण भोकर मतदारसंघात भाजप उमेदवाराला नगण्य आघाडी देऊ शकले; पण लोकसभेला भाजपचा पराभव झाल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी विधानसभेसाठी आपली कन्या श्रीजया चव्हाण यांना उभे केले आहे. श्रीजया विरुद्ध काँग्रेसने तिरुपती ऊर्फ पप्पू कदम कोंढेकर या तरुण कार्यकर्त्यास संधी दिली आहे.

हेही वाचा >>> व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!

भाजप आणि चव्हाण यांच्या तुलनेत काँग्रेस उमेदवाराकडे यंत्रणा आणि रसद अपुरी असली, तरी निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना कोंढेकर यांच्यासाठी मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ते वेगवेगळे मुद्दे मतदारांसमोर मांडून प्रचारात सक्रिय झाले आहेत.

शंकरराव चव्हाणांपासून या मतदारसंघावर काँग्रेस आणि या पक्षाच्या विचारांचेच प्राबल्य राहिले. शंकररावांच्या पश्चात त्यांची नात भाजपची उमेदवार झाली आणि तिला निवडून आणण्याच्या मोहिमेचे नेतृत्व अशोक चव्हाण करत असून, ते अतर्क्य मानले जात आहे. त्यांच्या या वैचारिक बदलाचा स्वीकार मतदार करणार का, हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे.

वंचित बहुजन आघाडीने सुरेश राठोड या व्यावसायिकास उमेदवारी देऊन भाजपच्या मतांमध्ये विभाजनाची व्यवस्था केली आहे. या भागातील जुने कार्यकर्ते नागनाथ घिसेवाड यांच्या उमेदवारीचा फटकाही भाजपलाच बसण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्णायक मुद्दे

● भोकरच्या ‘एमआयडीसी’त एकही मोठा प्रकल्प चव्हाण यांना आणता आला नाही. त्यातून रोजगार निर्मिती करता आली नाही. मुदखेड-अर्धापूर या भागात साखर कारखाना असला, तरी या कारखान्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला नाही. ●बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग अर्धापूर तालुक्यातून जाणार आहे. हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी या भागातील बाधित शेतकऱ्यांनी सतत लावून धरली आहे; पण लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसूनही राज्य सरकारने महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यावरून महायुतीबद्दल मोठा रोष दिसून येतो.