भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एक मोठे विधान केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान बनावे, असे वक्तव्य स्वामी यांनी केले. खरेतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे स्वामी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, "ममता बॅनर्जी अशा नेत्या आहेत, ज्यांना धमकावणे सोपे नाही. त्या धैर्यवान, धीट महिला नेत्या आहेत. त्यांनी ३४ वर्ष कम्युनिस्टांसोबत संघर्ष केला. बघ आज त्या काय करत आहेत. ममता बॅनर्जी या देशाच्या पंतप्रधान व्हायला हव्यात." देशाला प्रामाणिक विरोधकांची गरज मंगळवारी (दि. ९ मे) रोजी कोलकाता येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) द्वारा आयोजित एका कार्यक्रमात स्वामी यांनी हे वक्तव्य केले. सुब्रह्मण्यम स्वामी पुढे म्हणाले की, "देशाला आज प्रामाणिक विरोधक हवे आहेत. ज्यांना सत्ताधारी लोक धमकावू शकणार नाहीत. मी अशा अनेक लोकांना ओळखतो, जे आज एका मर्यादेपलीकडे सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका घेत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते की, ईडी त्यांच्यावर कारवाई करेल. भारतीय लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. भारताला सत्ताधाऱ्यांचे मित्र असलेला विरोधी पक्ष नको आहे." ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटबाबतही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत दहा दिवसांपूर्वीच भेट झाली. पण मी त्यांना कम्युनिस्टांसोबत त्यांचा संघर्ष सुरु असल्यापासून ओळखत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, २०२४ साली होणाऱ्या निवडणुका आणि त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था कशी असेल? यावर आम्ही चर्चा केली. देशात सर्वात शक्तीशाली महिला नेत्या कुणाला मानता? असाही प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना स्वामी म्हणाले की, एक वेळ होती, जयललिता आणि मायावती यांना मी सर्वात शक्तीशाली महिला मानत होतो. पण आजच्याघडीला ममता बॅनर्जी देशातील सर्वात शक्तीशाली महिला बनल्या आहेत. त्यांच्यात एवढी हिंमत आहे की त्या कोणत्याही मुद्द्यावर लढू शकतात. त्यांना कुणीही धमकावू किंवा घाबरवू शकत नाही. ममता बॅनर्जी यांचे जाहीर कौतुक करण्याची सुब्रह्मण्यम स्वामी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील त्यांनी २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांचे जाहीर कौतुक केले होते. तसेच त्यांची तुलना जयप्रकाश नारायण, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि पीव्ही नरसिंह राव यांच्यासोबत केली होती.