मणिपूरमधील दोन महिलांचा निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाऊन एक दिवसाचा पाहणी दौरा करून आले. या दौऱ्यानंतर तेथील परिस्थिती प्रचंड भीतीदायक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. “मणिपूरमध्ये जे काही चालले आहे, ते अतिशय भयानक आणि रानटी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे सर्वात भयावह हत्याकांड आहे आणि तेथील भाजपा सरकार उघड्या डोळ्याने शांतपणे हे सर्व पाहत आहे. तेथील परिस्थिती पाहून आम्हाला सर्वांना धक्काच बसला”, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील सदस्य, खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दिली.

गुरुवारी (दि. २० जुलै) तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ट्विट करत निषेध आणि संताप व्यक्त केला. “मणिपूरमध्ये उन्मादी जमावाने दोन आदिवासी महिलांसोबत जे रानटी कृत्य केले, ते पाहून हृदयाला वेदना झाल्या आणि संतापही आला. उपेक्षित महिलांना जो हिंसाचार सोसावा लागत आहे, त्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत. अशी अमानवीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांविरोधात आपल्याला एकजुटीने आणि ताकदीने उभे राहावे लागेल आणि त्यांचा निषेध करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा लागेल.”

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

हे वाचा >> Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?

आज (दि. २१ जुलै) पत्रकारांशी बोलत असताना बॅनर्जी म्हणाल्या, “सरकारने निर्बंध लादल्यानंतर सदर व्हिडीओ सोशल मीडियावरून हटविण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच अनेक लोकांनी या रानटीपणाची झलक पाहिली आहे. आमच्या हृदयाला असंख्य वेदना होत आहेत. आमच्या माता-भगिनींची अब्रू वेशीवर टांगलेली पाहताना अतीव वेदना होत आहेत. आता भाजपाचे नेते काय बोलणार? या प्रकरणावर त्यांची काय भूमिका आहे? ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.”

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही २६ विरोधी पक्ष एकत्र आले असून त्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. आम्ही काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मणिपूरला पाठविण्याचा विचार करत आहोत. “आम्ही (‘इंडिया’ आघाडी) मणिपूरच्या घटनेबाबत एकमेकांशी संवाद साधत आहोत. जर संधी मिळाली आणि इतर पक्षांनी सहमती दिली, तर काही मुख्यमंत्र्यांना आम्ही मणिपूरला पाठविण्याचा विचार करत आहोत. मला मणिपूरचा दौरा करायचा होता, त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यासाठी पत्र लिहिले होते, मात्र मला परवानगी मिळू शकली नाही. आम्हाला शांतता हवी आहे. त्यासाठी इतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना (आघाडीतील) मणिपूरला पाठवून तेथील जनतेशी संवाद साधण्यास परवानगी दिली गेली पाहिजे”, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा >> मणिपूर पेटले असताना त्याची राज्यसभेत चर्चा का झाली नाही? कोणत्या नियमांवरून चर्चा अडली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबत जे वक्तव्य केले, त्याच्यावरही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे. “पंतप्रधानांनी मणिपूरवर फार काही विशेष मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी मणिपूरबाबत बोलत असताना पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानचा उल्लेख केला. बंगालचा विरोध करण्यासाठी इतर ठिकाणचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. संघराज्य पद्धत चिरडली जात आहे. ते (पंतप्रधान) जेव्हा परदेशात जाऊन बोलतात, तेव्हा भारतात सर्वात मोठी लोकशाही असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात, तुम्ही एकपक्षीय राजवट राबवत आहात. त्यांच्या राजवटीत आज सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे.”

तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी मणिपूरमध्ये बळी गेलेल्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आणि निवारा केंद्रात ज्या पीडितांनी आश्रय घेतला आहे, त्यांच्याशी संवाद साधला. शिष्टमंडळातील सदस्य दस्तीदर यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे ६० हजार जवान तैनात असल्याची माहिती राज्यपाल अनुसूया उईके यांनी आम्हाला दिली. राज्यात पाच हजार घरे भस्मसात करण्यात आली आहेत. जवळपास ५७ हजार लोक तात्पुरत्या निवारा केंद्रात राहत आहेत. त्या ठिकाणी अन्न आणि औषधाची कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. हिंसाचाराचा दोन्ही बाजूच्या लोकांनाही फटका बसला आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जून महिन्यातच मणिपूरचा दौरा करायचा होता. मात्र, तिथे तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. मणिपूरच्या राज्यपालांनी आम्हाला सांगितले की, जर पीडित व्यक्तींना ममता बॅनर्जींची भेट घ्यायची असेल तर ते कोलकाता येथे जाऊ शकतात.

आणखी वाचा >> ‘आमची तुलना मणिपूरमधील तुमच्या अपयशाशी करू नका’, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना प्रत्युत्तर

तृणमूल काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते राहुल सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिले की, पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान जो हिंसाचार झाला, त्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे. सिन्हा पुढे म्हणाले, “मणिपूर सरकारने दोषींवर कारवाई केली आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. पण, पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवरून तृणमूल काँग्रेस लक्ष का हटवत आहे? असा आमचा प्रश्न आहे. पंचायत निवडणूक ८ जून रोजी जाहीर झाली, तेव्हापासून राज्यात खूप लोकांच्या हत्या झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एवढे लोक का मारले गेले? याचे आधी उत्तर तृणमूलने द्यावे.”