चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ७० जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा नुकतीच केली. चंद्रपूर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत त्यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानल्याचे दिसते आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रभारींपाठोपाठ महानगर अध्यक्षपदी राहुल पावडे तर जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा या मुनगंटीवार समर्थकांची वर्णी लागल्याने जिल्हा भाजपमध्ये मुनगंटीवार यांचेच वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री शोभा फडणवीस सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि विद्यमान वनमंत्री मुनगंटीवार असे दोन गट सध्या सक्रिय आहेत. या दोन्ही गटांत सातत्याने कुरघोड्या सुरूच असतात. त्यात मुनगंटीवार गट नेहमीच वरचढ ठरला आहे. त्याला कारणही तसेच आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहीर यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीसह जिल्हा तथा विविध समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये मुनगंटीवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीच वर्णी लागत आली आहे.

हेही वाचा – अविश्वास प्रस्तावामुळे आतापर्यंत कुणाकुणाचे सरकार पडले?

हेही वाचा – NDA की INDIA बसपा पक्ष कोणाशी युती करणार? मायावती म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणूक प्रभारीपदासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी मुनगंटीवार समर्थकांचीच नियुक्ती झाली आहे. त्यापाठोपाठ आता महानगर व जिल्हाध्यक्षपदीही त्यांच्याच समर्थकांची वर्णी लागली. या सर्व नियुक्त्यांमध्ये अहीर समर्थकांचा समावेश नाही. भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये यापूर्वीही मुनगंटीवार गटालाच झुकते माप मिळाले आहे. जिल्हा परिषदेत दहा वर्षे आणि महापालिकेत साडेसात वर्षे भाजपची सत्ता होती. तेव्हाही मुनगंटीवार समर्थकच प्रमुखपदावर विराजमान होते. अहीर समर्थकांना सातत्याने डावलले जात असल्यामुळे माजी नगरसेवक वसंता देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आताही अहीर यांच्याकडे बोटावर मोजता येतील, असा निवडक समर्थकांचाच गोतावळा आहे, तोही हळूहळू कमी होत चालला आहे. दुसरीकडे, मुनगंटीवार समर्थकांमध्ये वाढच होत आहे. यामुळेच भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये मुनगंटीवार गटालाच प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.