छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) २६ वा वर्धापनदिन पुण्यात १० जून रोजी उत्साहात साजरा झाला. पण चर्चा अधिक झाली ती फर्डे वक्ते, माजीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मौनाची ! धनंजय मुंडे यांच्या मौनाला त्यांच्या समर्थकांकडून आता ‘पक्षशिस्तीतील नेता’ ही प्रतिमा रुजवण्याचा प्रयत्न होत आहे. तसे संदेश समाज माध्यमातून सोडण्यात येत असून, जोडीला आजारपणानंतर मुंडे हे पक्षाच्या कार्यक्रमातही सक्रीय झालेले दिसत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची रणनीती आखली जात आहे, विरोधकांकडून रचलेल्या चक्रव्यूहात फसणारा अभिमन्यू आपण नाही तर चक्रव्यूह भेदून बाहेर पडणाऱ्यांपैकी एक आहोत, असे मुंडे यांनी राजीनाम्यापूर्वीच्या शिर्डीतील अधिवेशनात केलेले भाषण बीडमध्ये समाज माध्यमांमध्ये फिरवले जात आहे. त्यांचे वरील विधान अधिवेशनातच नव्हे तर राज्यभर गाजले होते. मात्र, त्यानंतरच्या काही दिवसातच संतोष देशमुख यांची आरोपींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची छायाचित्रे समोर आली. या छायाचित्रांमुळे अवघ्या महाराष्ट्रामध्यक संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आणि अखेर त्यांना ४ मार्च रोजी राजीनामा द्यावा लागला. तेव्हाही त्यांचा ‘अभिमन्यू’ झाला, अशीच चर्चा रंगली होती.
अखंडित राष्ट्रवादीत असताना धनंजय मुंडे यांनी, कोणाच्याही नादाला लागा, वाटेला जा, पण पक्षाचे नेते शरद पवार यांचा नाद करायचा नाही, असेही वक्तव्य करून टाळ्या मिळवून निष्ठा व्यक्त केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ज्येष्ठ पवारांनी धनंजय मुंडे यांना अधिक ‘लक्ष्य’ केल्याची चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनीही आपल्या भाषणातून आपले नेतृत्त्व संपवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा सांगत शरद पवारांच्या आरोपांवर प्रतिवाद केला होता.
मुंडे यांचे वक्तृत्त्व विधिमंडळातही कायम चर्चेत राहिलेले आहे. राजीनाम्यानंतर मुंडे यांना काही आजारांनीही ग्रासले. डोळ्यांवर शस्त्रक्रियाही पार पडली. बेल्स पाल्सी आजारामुळे बोलण्यावरही मर्यादा आली. मौन व्रतासाठी ओळख असलेली विपश्यना साधनाही मुंडे यांनी अलीकडेच ईगतपुरी येथील केंद्रात दहा दिवस राहून पूर्ण केली. तेथून परतल्यानंतर मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात सक्रीय झाले असले तरी ते बोलत नसल्याचे दिसून आले. ३ जून रोजी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातही धनंजय मुंडे बोलले नाहीत. ते बोलणार नसल्याचे पंकजा मुंडे यांना जाहीरपणे सांगावे लागले.
१० जूनच्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही धनंजय मुंडे प्रत्यक्ष मंचावर अगदी अजित पवार यांच्या नजीकच बसलेले होते. मात्र त्यांचे भाषण झाले नाही.त्यांच्या वर्धापनदिनातील मौनाची वेगळीच चर्चा रंगली. मग मुंडे यांच्या मौनाबाबत ‘पक्षशिस्तीचा नेता’ म्हणून त्याचा प्रसार अनेक पदाधिकारी समाजमाध्यमातून करताना दिसत आहेत.
माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळाले होते. त्यांना बोलण्याचा आग्रहही होता. परंतु आजारपणामुळे ते बोलू शकले नाहीत. त्यांचा वावर पक्षाचा एक शिस्तीतला कार्यकर्ता म्हणून असून, आमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांना हा गुण शिकण्यासारखा आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, परळी.