दीपक महाले

जळगाव : सध्या सहकार क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी बंडखोरी करीत भाजप-शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची स्वपक्षातून आता कोंडी केली जात आहे. बँकेच्या पहिल्याच सभेला अनुपस्थित राहून राष्ट्रवादीच्या संचालकांनी एकप्रकारे बहिष्कार टाकला. अध्यक्षांनी मात्र स्वक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी सभेला उपस्थित राहण्याचा आदेश दिल्याचा, तसेच अनुपस्थित राहिलेल्या संचालकांना शेतकरी हित मान्य नसल्याचा आरोप केला आहे. आता शनिवारी तहकूब सभा बोलाविण्यात आली असून, त्या सभेला तरी राष्ट्रवादीचे सर्व संचालक उपस्थित राहतील काय, याची उत्सुकता आहे.

जिल्हा बँक निवडणुकीनंतर सोमवारी बोलाविण्यात आलेली सभा गणपूर्तीअभावी तहकूब झाली. गणपूर्तीसाठी ११ संचालकांची उपस्थिती आवश्यक असताना अध्यक्ष संजय पवार यांच्यासह अवघे सहा संचालक उपस्थित होते. बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० संचालक आहेत. अध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून नाव निश्‍चित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करीत स्वपक्षाचेच संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटाच्या साथीने राष्ट्रवादीची सत्ता उलथविल्याचा रोष त्यांच्यावर राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचा आहे.

हेही वाचा… मोर्चे आणि यात्रांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये भाजपचा ताकद वाढविण्याचा प्रयत्न

पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात एकनाथ खडसेंना मोठा धक्का होता. त्यावेळी खडसेंनी महाविकास आघाडीतील पक्षांनी केलेली गद्दारी आणि विश्‍वासघातामुळे जिल्हा बँक हातून निसटल्याचे म्हटले होते. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले होते. आता बँकेच्या पहिल्याच सभेला राष्ट्रवादीचे आमदार खडसेंसह देवकर, डॉ. सतीश पाटील, अ‍ॅड. रवींद्र पाटील, अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, घनश्याम अग्रवाल, आमदार अनिल पाटील, नाना पाटील हे नऊ संचालक अनुपस्थित राहिले.

हेही वाचा… अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग ; भाजप व ठाकरे गटात संघर्ष

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा नामोल्लेख न करता, अध्यक्ष संजय पवार यांनी स्वपक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनीच इतर संचालकांना भ्रमणध्वनीवरून सभेला उपस्थित न राहण्याचा आदेश दिला होता, असे स्वपक्षाच्या दोन संचालकांनीच आपणास सांगितल्याचा दावा केला. सभेत शेतकरी हिताचे विविध निर्णय घ्यायचे होते. त्यात कर्जवाटपासह विविध कार्यकारी सोसायट्यांसह कर्जवसुली व इतर विषयांवर निर्णय होणार होते. मात्र, जे संचालक आले नाहीत, त्यांना शेतकरी हित मान्य नसेल कदाचित. त्या दोन ज्येष्ठ संचालकांना पराभव जिव्हारी लागल्याचेही अध्यक्ष पवार यांनी म्हटले. शक्यतो स्वपक्षाचेच संचालक सभेला अनुपस्थितीचा आरोप करीत स्वपक्षावरच त्यांनी घणाघाती प्रहार केले. यापूर्वी बँकेच्या प्रत्येक सभेला हजर होतो. देवकर हे अध्यक्ष राहिले. त्यानंतर अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर या सात वर्षे अध्यक्षपदी होत्या; पण आम्ही कधीही असे केले नाही. रोहिणी खडसे या तर भाजपच्या अध्यक्षा होत्या, त्यावेळी राष्ट्रवादीचेच संचालक उपस्थित राहत होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा विषय अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घालणार असल्याचेही संजय पवार यांनी म्हटले आहे. २० वर्षांनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संधी मिळालेले संजय पवार यांची स्वपक्षातूनच कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बँकेच्या पहिल्याच सभेला संचालकांच्या अनुपस्थितीने दाखवून दिले. मात्र, त्या ज्येष्ठ नेत्यांसह इतर संचालकांनी अनुपस्थितीबाबतची कारणेही दिली आहेत. संजय पवार यांनी विनाकारण आरोप करू नये, पक्षाकडून कुणालाही सभेला उपस्थित न राहण्याबाबत सांगितलेले नाही. प्रत्येकाची सभेला येण्याची विविध कारणे असू शकतात. पवार ज्यांच्या पाठिंब्याने अध्यक्षपदी विराजमान झाले, त्यांना सभेसाठी बोलाविले असते, तरी गणपूर्ती झाली असती, असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी हाणल्याने संजय पवार यांच्याशी राष्ट्रवादीचे असहकाराचे धोरण यापुढेही सुरु राहण्याची चिन्हे दिसतात.

हेही वाचा… राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती राष्ट्रीय पक्ष होते? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० शिवसेना शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, भाजप एक असे पक्षीय बलाबल आहे.