PM Modi on Operation Sindoor : भारताचा द्वेष करणे व शेजाऱ्यांना हानी पोहोचवणे हेच पाकिस्तानचे एकमेव ध्येय आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातच्या दाहोद येथील सभेतून केली. आमच्या बहिणींचे ‘सिंदूर’ पुसण्याचे धाडस करणाऱ्यांचा अंत निश्चित आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ लष्करी कारवाई नसून भारताच्या नीतिमत्ता आणि भावनांचे प्रतीक होते, असे वर्णनही पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोमवारी गुजरातमधील दाहोद येथील २४ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाने २१,४०५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या देशातील पहिल्या नऊ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह रोलिंग स्टॉक वर्कशॉपचे पंतप्रधानांनी अनावरण केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी उपस्थित नागरिक तिरंगा फडकवत असताना, मोदींनी दुधीमती नदीच्या तीरावर महर्षी दधीची यांच्या बलिदानाचे तसेच तात्या टोपे व मंगढचे गोविंद गुरु यांच्या पाठिशी उभे राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.
“मोदी शांत कसे बसू शकतात?”
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “दाहोद ही भक्ती व बलिदानाची भूमी आहे. हा प्रदेश भारतमाता आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या बलिदानाचे उदाहरण देतो. मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांच्या रक्तामध्ये आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि मोदी शांत कसे बसू शकतात? जो कोणी आमच्या बहिणींच्या कपाळावरील ‘सिंदूर’ पुसण्याचे धाडस करेल, तो निश्चितच संपेल. मोदींविरुद्ध लढणे किती कठीण असेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल.”
आणखी वाचा : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारा नेता ईडीच्या रडारवर; काय आहे नेमकं प्रकरण?
“‘त्या’ फोटोंकडे पाहून माझं रक्त खवळतं”
सोमवारी सकाळी पंतप्रधानांनी प्रथम वडोदरा, नंतर दाहोद आणि त्यानंतर भूज येथे रोड शो केला. जिथे लाल साड्या परिधान करून आलेल्या हजारो महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतात दहशतवाद पसरवणाऱ्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, मोदींशी सामना करणे किती कठीण असेल. फक्त विचार करा, त्या दहशतवाद्यांनी मुलांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या झाडल्या, त्या फोटोंकडे पाहून माझं रक्त खवळतं. या दहशतवाद्यांनी १४० कोटी भारतीयांना थेट आव्हान दिलं होतं, आणि म्हणूनच मोदीने तेच केलं, ज्यासाठी देशाने आणि तुम्ही मला तुमचा नेता म्हणून निवडून दिलं होतं.”
“२२ मिनिटांत दहशतवाद्यांची सर्व तळं उद्ध्वस्त”
पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणं टिपून कसे मातीत मिळवले याबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले, “मोदींनी तिन्ही सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. त्यांनी देशांच्या शत्रूंबरोबर जे काही केलं गेलं, ते अनेक दशकांपासून कोणी पाहिलं नव्हतं. आम्ही सीमापार नऊ मोठ्या दहशतवादी तळांचा शोध घेतला होता. त्यांच्या ठिकाणांचा आणि हालचालींचा आम्हाला ठोस पुरावा मिळवला. दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला जे काही कृत्य केलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ६ मेच्या रात्री केवळ २२ मिनिटांत त्यांची सर्व तळे उद्ध्वस्त केली. या कारवाईने घाबरून गेलेल्या पाकिस्तानी लष्कराने जेव्हा भारतावर हल्ला करण्याचा असफल प्रयत्न केला, तेव्हा आमच्या सशस्त्र दलांनी त्यांनाही चांगलाच धडा शिकवला.”
“भारतद्वेष हेच पाकिस्तानचे ध्येय”
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुख्य फरक म्हणजे, भारताने निश्चित केलेली विकासाची उद्दिष्टे. फाळणीमधून निर्माण झालेल्या या देशाचा (पाकिस्तानचा) एकमेव हेतू म्हणजे भारताशी वैर ठेवणे, भारताविरोधात द्वेष पसरवणे आणि भारताचे नुकसान करणे असा आहे. तर दुसरीकडे, भारताचे ध्येय गरिबी दूर करणे, आर्थिक विकास घडवून आणणे, आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचे आहे. आपला देश विकसित करायचा असेल, तर आपले सशस्त्र दल मजबूत असणे अत्यावश्यक आहे,” असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा : पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक?
पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी काय केलं?
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, “२६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर, मोदींनी अकल्पनीय आणि अभूतपूर्व निर्णय घेतले, ज्यामुळे अनेक दशकांपासून असलेली बंधनं तोडून सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यास मदत झाली. माझे संपूर्ण लक्ष उत्पादन वाढवणे आणि आयात कमी करण्यावर होते.” आपल्या भाषणात दाहोद जिल्ह्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, कधी काळी देशातील १०० मागास जिल्ह्यांपैकी एक मानला जाणारा दाहोद आज जागतिक नकाशावर आहे, कारण येथे तयार होणाऱ्या लोकोमोटिव्ह इंजिनांची आता जगभरात निर्यात होणार आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्र्याची अनुपस्थिती
दरम्यान, गुजरातचे कॅबिनेट मंत्री आणि दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया येथील आमदार बच्छूभाई खाबाड यांची पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. अगदी काहीच दिवसांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मध्ये कथित गैरव्यवहार प्रकरणात गुजरातचे कॅबिनेट मंत्री बच्छूभाई खाबाड यांच्या मुलांना नुकतीच अटक झाली होती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर कॅबिनेट मंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतानाही खाबाड यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. या कथित घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्यात गुजरातमधील आदिवासी भागांना, विशेषतः दाहोद जिल्ह्यात झालेल्या विविध प्रकल्पांची व शासकीय योजनांची माहिती दिली.